रोजगार, व्यवसायासाठी 
सरकारने योजना आणाव्यात

रोजगार, व्यवसायासाठी सरकारने योजना आणाव्यात

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. १५ : पालघर जिल्ह्यात सुमारे १५ हजारांहून अधिक दिव्यांग बांधव आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारच्या नव्या योजना, त्यांना हवी असणारी मदत, रोजगार, व्यवसायात सामावून घेणे, अपंगत्व दाखले वेळेवर मिळायला हवेत; तसेच रेल्वेचा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. याशिवाय, स्थानिक समस्या या येणाऱ्या नव्या सरकारने सोडवल्यास आम्हाला दिलासा मिळेल आणि विकासाच्या दिशेने वाटचाल उत्तम होईल, अशा प्रतिक्रिया दिव्यांग बांधवांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
दिव्यांगांना मिळणारी पेन्शन दर सहा महिन्यांत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. याची पेन्शनमध्ये वाढ करावी. तसेच त्यांना मिळणारे मासिक अनुदान हे फार कमी आहे. यामध्ये वाढ होणे आवश्यक आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अधिक आर्थिक निधीची तरतूद करण्यात यावी. त्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर दिव्यांग खेळाडू पुढे जातील आणि देशाचे नाव उज्ज्व‍ल करतील. महापालिकेत कायमस्वरूपी आणि ठेक्यांमध्ये दिव्यांगांसाठी पाच टक्के नोकरी भरती प्रक्रिया असावी. प्रत्येक प्रभागात दिव्यांगांसाठी लिफ्टची सोय व्यवस्था असावी, यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही. रोजगारासाठी स्टॉल आणि परवाना दिल्यास त्यांचे जीवनमान उंचावेल आणि त्यांची आर्थिक स्थिती बळकट होईल, अशा अपेक्षा आगामी सरकारकडून व्यक्त होत आहेत.
---------------------

दिव्यांग बांधवाना अनेक समस्या भेडसावत असतात. रेल्वेमध्येही दिव्यांगांसाठी स्वतंत्र डबा आहे; मात्र तेथे अन्य प्रवासी येतात. त्यामुळे अडचण होते. यासाठी अन्य प्रवाशांना बंदी करावी. बेरोजगारांसाठी नोकरीभरती प्रक्रिया राबवून सामावून घ्यावे; तसेच पेन्शन वाढ झाली पाहिजे. जिल्हा शल्य चिकित्सक अपंगत्व दाखले आणि यूडीआयडी कार्ड मिळावे.
- देवीदास केंगार, संस्थापक, अपंग जनशक्ती संस्था

वसई-विरार महापालिकेत दिव्यांगांना ये-जा करावी लागते; मात्र पायऱ्यांवरून जाताना त्रास होतो. त्यामुळे प्रत्येक प्रभागात दिव्यांगांसाठी लिफ्टची सोय व्यवस्था केली तर बरे होईल. तसेच, पालघर जिल्ह्यात बेरोजगार दिव्यांगांना रोजगारासाठी स्टॉल उभारले, तर एक चांगली संधी मिळेल. यासाठी परवाना द्यावा; जेणेकरून आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींना फायदा होईल आणि स्वयंरोजगाराचे साधन मिळेल.
- रमा पवार

कोरोनाकाळात दिव्यांग बांधवाना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. हाताला रोजगार नव्हता; तसेच मिळणारे अनुदानही अत्यल्प होते. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. दिव्यांगांना मिळणारे मासिक अनुदान येणाऱ्या नव्या सरकारने वाढवले तर आपत्कालीन परिस्थितीत त्याचा फायदा होईल. तसेच उत्तम योजना राबवण्याचीही गरज आहे. विविध योजनांमुळे पालघर जिल्ह्यातील हजारो दिव्यांगांचे जीवनमान उंचावेल.
- नितेश भुताव, दिव्यांग बांधव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com