मतदान यादीत नाव वगळले इथे नोंद करा

मतदान यादीत नाव वगळले इथे नोंद करा

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ : वर्षानुवर्षे मतदान करणाऱ्या मतदारांची नावेच यादीतून गायब झाल्याने मोठा गोंधळ उडाल्याचे सोमवारी (ता. २०) पाहायला मिळाले. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांबरोबरच माजी नगरसेवक, व्यावसायिक, उद्योजक, राजकीय पदाधिकारी यांचीही नावे वगळल्याचे आढळून आले आहे. काही मतदार हे विदेशातून मतदान करण्यासाठी खास आले होते; मात्र त्यांचेही नाव नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही. याप्रकरणी मनसे तसेच दक्ष नागरिक संघटनेने मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांची नावे नोंदवून घेतली जात आहेत. ही नावे निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार आहेत. त्यासोबतच निवडणूक आयोगाच्या या कार्यपद्धतीच्या विरोधात व्यावसायिक संदेश प्रभुदेसाई हे ॲड. मंगेश कुसूरकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. ॲड. कुसूरकर यासंदर्भात माहिती जमा करत असून न्यायालयीन सुटी संपताच ही याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मतदार यादीत नावच नसल्याने सुमारे ८० हजारांहून अधिक मतदारांना मतदान करता आलेले नाही. नाव वगळलेले अनेक मतदार हे वर्षानुवर्षे त्याच पत्त्यावर राहत आहेत; मात्र तरीही त्यांचे नाव मतदार यादीत नाही. घरातील आठ सदस्यांपैकी तीन लोकांची नावे आहेत; मात्र अन्य सदस्यांची नावेच नसल्याचे चित्र सोमवारी आढळून आले. याप्रकरणी नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे तक्रारीदेखील केल्या; परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडली. खुद्द लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी बुथवर जाऊन मतदारांची नावे शोधत होते. डोंबिवलीतील व्यावसायिक संदेश प्रभूदेसाई यांनी यापूर्वी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांमध्ये मतदान केले आहे. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मतदान यादीत नाव होते; मात्र त्यांचे नाव गायब असल्याचे त्यांना आढळून आले. निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारामुळे मतदान त्यांना करता आले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. असे अनेक जणांच्या बाबतीत झाल्याने मतदारांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका निवडणूक आयोगाच्या विरोधात ॲड. कुसूरकर यांच्यामार्फत ते दाखल करणार आहेत.

निवडणूक आयोगाकडे तक्रार
कल्याण, डोंबिवलीतील ज्या नागरिकांची नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत, त्यांना लोकसभा निवडणुकीत मतदानापासून वंचित राहावे लागले. अशा नागरिकांंनी दक्ष संघटनेच्या माध्यमातून, सामाजिक कार्यकर्ते अक्षय फाटक यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे यासंंदर्भात तक्रारी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेसाठी मतदानापासून वंचित नागरिकांकडून एक गुगल अर्ज भरून घेतला जात आहे. या तक्रार प्रकरणात सहभागी इच्छुकांंनी आपली माहिती ९८७०९८५९१० या व्हाॅट्सॲप क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन जागरूक संघटनेने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com