निकालाचे काऊंट डाऊन सुरू

निकालाचे काऊंट डाऊन सुरू

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता निकालाचीही प्रतीक्षा मंगळवारी (ता. ४) संपणार आहे. देशात कुणाची सत्ता येणार, राज्यात कोण बाजी मारणार, याचे अंदाज एक्झिट पोलने बांधले आहेत; मात्र त्याचवेळी ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघातही कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातही ठाणेदार कोण, याचा अंदाज बांधण्यात सर्वच ‘चाणक्य’ चक्रावले आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघातही अशीच संभ्रमाची अवस्था आहे. तर कल्याणमध्ये विद्यमान खासदार हॅटट्रिक करणार, अशी परिस्थिती सध्यातरी दिसते.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी २० मे रोजी मतदान पार पडले. या तीन लोकसभा निवडणुकीसाठी तब्बल ७९ उमेदवार रिंगणात होते; मात्र खरी लढत सात मातब्बर उमेदवारांमध्ये होती. राजन विचारे, कपिल पाटील आणि डॉ. श्रीकांत शिंदे हे तीन उमेदवार हे विद्यमान खासदार असून विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी ते पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात उतरले होते. या तीन विद्यमानला टक्कर देण्यासाठी तितकेच ताकदीचे उमेदवार यावेळी निवडणुकीच्या मैदानात होते. ठाण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार राजन विचारे विरुद्ध महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के, कल्याणमध्ये महायुतीचे विद्यमान खसदार डॉ. श्रीकांत शिंदे विरुद्ध महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर तर भिवंडीत महायुतीचे विद्यमान खासदार कपिल पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे अशी लढत झाली.

महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत असली तरी जिल्ह्यात ठाणे व कल्याण या दोन ठिकाणी शिवसेनेच्या दोन गटांचे उमेदवार आमने-सामने होते. ताकद कुणाची, खरी शिवसेना कुणाची, याचा कौल जनतेच्या न्यायालयात सिद्ध करण्यासाठी दोन्ही गटाने आपली शक्ती व प्रतिष्ठा पणाला लावली होती. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण पश्चिम येथे भव्य सभा झाली. तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही डोंबिवली व ठाण्यात दोन सभा घेतल्या. शरद पवार यांनी शहापूर, भिवंडी व कल्याणमध्ये झंझावाती सभा घेतल्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शेवटच्या टप्प्यात सभा गाजवली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला. या सर्वांचा परिपाक मतदानाच्या रूपाने कुणाच्या बाजूने आहे, याचा निकाल ४ जूनला लागणार आहे.

ठाण्यात अटीतटीचा सामना
ठाणे लोकसभा मतदारसंघात सत्ता विरुद्ध निष्ठा असा सामना पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची जादू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वलयाचा करिष्मा, सत्ता, आर्थिक रसद अशी भक्कम बाजू महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या बाजूने होती. त्यांच्या उमेदवारीवर भाजपच नव्हे तर शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्तेही नाराज होते. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर त्यांना मतांचा डोंगर उभा करणे अशक्य असल्याने खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही म्हस्के यांच्या प्रचाराची धुरा हातात घेतली होती. त्यात ठाणे लोकसभा मतदारसंघ हट्टाने मुख्यमंत्र्यांनी घेतला, तसेच त्यांचा हा बालेकिल्ला असल्याने कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे, त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. दुसरीकडे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांची मोठी फौज नसली तरी तळातील कट्टर शिवसैनिक त्यांच्यासोबत ठाम उभा असल्याचे चित्र पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती आणि सर्वांना अंगावर घेणारा निष्ठावंत अशी प्रतिमा तयार करण्यात ते यशस्वी झाले.

ग्राऊंड रिपोर्ट
दोन्ही शिवसेनेत येथे कांटे की टक्कर आहे; पण खासदार राजन विचारे यांच्या बाजूने तळागाळातील मतदारांचा कौल अधिक असल्याचे पाहायला मिळाले. झोपडपट्टी, मुस्लिमबहुल भागातून त्यांना एकगठ्ठा मते मिळाल्याचा अंदाज आहे. त्यात वंचितची ४६ हजार मतेही त्यांच्या खात्यात वळती झाल्याचे समजते. नवी मुंबईत नाईक कुटुंबीयांच्या असहकाराचा फायदाही विचारे यांना मिळताना दिसतो. कोपरी- पाचपाखाडी, ठाणे शहर या दोन विधानसभा मतदारसंघात जो लीड घेईल तोच विजयाची माळ गळ्यात घालेल, अशी चर्चा आहे. येथून नरेश म्हस्के यांना अपेक्षा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा करिष्मा चालला तर नरेश म्हस्के हे पालिकेतून थेट संसद भवनात दिसतील.


भिवंडी परिवर्तनाच्या उंबरठ्यावर
भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील विरुद्ध महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्यात लढत झाली. सुरुवातीला या मतदारसंघात अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे यांच्यामुळे तिरंगी लढत पाहायला मिळाली; पण प्रचार ऐन रंगात येत असताना सांबरे बॅकफूटवर गेले. या मतदारसंघातून कपिल पाटील हे तिसऱ्यांदा खासदार बनण्याच्या तयारीत आहे. त्यांच्या या स्वप्नांना बाळ्या मामा सुरुंग लावणार, असा कल दिसतो. त्यामुळे भिवंडीत पुन्हा कमळ फुलणार की तुतारी वाजणार हे ४ जूनलाच समजेल. एक्झिट पोलने कपिल पाटील यांच्या बाजूने कौल दिला आहे. असे असले तरी ग्राऊंड रिपोर्टला परिवर्तन घडेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. वास्तविक मुस्लिमबहुल असा हा मतदारसंघ असला तरी मोदी लाटेत दोन वेळा भिवंडीत कमळ फुलवण्यात कपिल पाटील यांना यश आले होते. त्यात केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाल्याने त्यांची ताकद वाढली आहे; पण त्यासोबतच एकसंघ शिवसेना असताना जी मतांची शक्ती त्यांना मिळत असे ती दोन गटांत विभागल्याने त्याचाही फटका बसण्याची शक्यता आहे.

ग्राऊंड रिपोर्ट
मुरबाडमध्ये कथोरे यांच्या असहकार्याचा फटका पाटील यांना बसण्याची शक्यता आहे. आगरी आणि कुणबी मतांची विभागणी झाली आहे; पण मुस्लिम व दलित एकगठ्ठा मते महाविकास आघाडीच्या खात्यात पडल्याचे दिसते. ही मते खाण्यासाठी अपक्षांची मोठी फौज उभी करण्यात आली होती; पण यावेळी मतदार अधिक सजग होते, असे दिसले. भाजपला फटका बसेल, अशा पॉकेटमधून सर्वाधिक मतदान झाल्याचे दिसते. मतदानाच्या दिवशी कपिल पाटील यांचा संयमही सुटल्याचे पाहायला मिळाले. त्यावरूनच अनेकांनी त्यांच्या पराभवाचे भाकीत मतदानाच्या दिवशीच केले; पण तरीही पाटील काठावर पास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


कल्याणमध्ये निर्विवाद हॅटट्रिक
कल्याण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे निर्विवाद विजयाची हॅटट्रिक मारणार असे दिसते; मात्र त्यांना अपेक्षित असलेली विक्रमी मते मिळण्याची आशा मावळली आहे. या मतदारसंघात त्यांची थेट लढत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासोबत होती. ठाण्यात जशी दोन शिवसेनेत चुरशीची लढाई पाहायला मिळाली तशी ती कल्याणमध्ये दिसली नाही. एकीकडे डॉ. शिंदे यांचा झंझावाती, हायटेक प्रचार तर दुसरीकडे दारोदारी प्रचार करणारे ठाकरे गटाचे शिवसैनिक असे चित्र या निवडणुकीत पाहायला मिळाले; पण मतदानाच्या दिवशी ज्या संख्येने व ज्या भागातून मतदार मतदानासाठी उतरला ती विद्यमान खासदारांसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असल्याचा पूर्ण ‘लाभ’ डॉ. श्रीकांत शिंदे यांना मिळाला आहे. सर्वाधिक विकास निधी आणण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्या जोरावरच ते यावेळी तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे गेले; पण त्यांच्या या आत्मविश्वासाचा रथ अडवण्याचा प्रयत्न स्थानिक भाजप नेत्यांकडूनच झाल्याचे दिसले. प्रचारात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते कुठेच नव्हते. मनसेची साथ मतदानात किती परावर्तीत झाली हेही पाहावे लागेल. त्यामुळे सुरुवातीला अगदी सोपी भासणारी येथील लढत मतदानाच्या दिवशी अटीतटीची भासू लागली. किंबहुना त्यामुळेच मतदानाच्या दिवशी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुलासाठी कल्याणमध्ये धाव घ्यावी लागल्याचेही दिसले.

ग्राऊंड रिपोर्ट
मुंब्रा- कळवा, कल्याण ग्रामीण आणि कल्याण पूर्व या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानावरच विजयाची मदार असणार आहे. कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील हे शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय होते; पण या पट्ट्यात ठाकरे गटाचे सुभाष भोईर यांचेही वर्चस्व आहे. त्यामुळे या मतदारसंघातून दोन्ही शिवसेनेला समसमान मते पडण्याची शक्यता आहे. कल्याण पूर्व हा गणपत गायकवाड यांचा मतदारसंघ असून त्यांच्या तुरुंगवारीमुळे या मतदारसंघातून शिंदे यांना सहकार्य मिळाले नसल्याचे दिसते. तर मुंब्रा- कळव्यातूनही शिंदे यांना साथ मिळणे कठीण दिसते; पण हा मतांचा टक्का उल्हासनगर, डोंबिवली व अंबरनाथ येथून भरून निघेल, असा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com