रिसॉर्टमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत

रिसॉर्टमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत

विरार, ता. २ (बातमीदार) : येथील रिसॉर्टमध्ये गेल्या आठवड्यात एका मुलीचा बुडून मृत्यू झाल्यानंतर या परिसरातील रिसॉर्टमधील सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आला आहे. मागील काही वर्षांत सातत्याने अशा घटना घडत असताना प्रशासकीय यंत्रणा या घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे, असे निरीक्षण नोंदवत शिवसेनेचे जिल्हा सचिव अतुल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.

वसई-विरार महापालिका परिसरात ४० हून अधिक रिसॉर्ट आहेत. यातील बहुतांश रिसॉर्ट सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधण्यात आले आहेत. शिवाय अनेक रिसॉर्टनी महापालिकेची बांधकाम परवानगीही घेतलेली नाही. मात्र त्यानंतरही महसूल विभाग अथवा महापालिका प्रशासन कारवाई करत नसल्याचा दावा अतुल पाटील यांनी केला. मद्य व अन्य वस्तू बिनदिक्कत मिळत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जात नाही. राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार पाटील यांनी केली आहे.

या रिसॉर्टमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थाचा दर्जाही राखला जात नाही. मात्र अन्न व औषध प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पर्यटकांचा विरंगुळा व्हावा, हा मुख्य उद्देश रिसॉर्टचा असला तरी या उद्देशाला बगल देऊन यातील बहुतांश रिसॉर्टमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे निरीक्षण या तक्रारीत नोंदवण्यात आले आहे. परिणामी या रिसॉर्टमध्ये अनेक अपघात घडलेले आहेत. स्विमिंग पूलमधील पाण्याचा दर्जा तपासला जातो किंवा नाही, याबाबतही या तक्रारीत शंका उपस्थित करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com