रायगडचा साडेचार लाखाचा खासदार

रायगडचा साडेचार लाखाचा खासदार

साडेचार लाख मतांचा खासदार!
रायगड मतदारसंघात चुरशीचे सातत्य यंदाही कायम

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३ : अटीतटीच्या झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत रायगडचा भावी खासदार कोण, हे मंगळवारी ठरणार आहे. शिवसेनेचे नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात रायगड लोकसभेसाठी तिसऱ्यांदा लढत होत आहे. यापूर्वी २०१४ मध्ये अनंत गीते तर २०१९ मध्ये सुनील तटकरे यांनी रायगड सर करून बरोबरी साधली आहे. याही वेळी दोघांमध्ये चुरशीची लढत होत आहे. यात जो उमेदवार साडेचार ते पाऊण पाच लाख मतांचा पल्ला गाठेल, त्याच्याच गळ्यात विजयाची माळ पडेल, असे राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे.
सुनील तटकरे आणि अनंत गीते या दोघांनीही आधीच्या निवडणुकीत यांनी पाच लाखांचा पल्ला गाठला आहे, त्यामुळे आताही आपणच लक्ष्मण रेखा पार करणार, असा दावा दोघांकडून केला जात आहे. मात्र, रायगडच्या १६ लाख ६८ हजार मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे, हे दुपारी तीन वाजेपर्यंत कोणालाच सांगता येणार नाही.
प्रत्येक फेरीनुसार चुरस अधिकच वाढणार आहे. कोणत्या फेरीनंतर कोण आघाडीवर, कोणत्या विधानसभा मतदारसंघात कुणाची सरशी, किती मतदारांनी ‘नोटा’ ला मतदान केले आणि शेवटी निकाल लागल्यानंतर पराभवाचे फोडले जाणारे खापर, अशा अनेक मुद्द्याने खासदारकीचा दावेदार निश्‍चित होईल. या निकालावर विधानसभा निवडणुकीची बीजे रोवली असल्याने खासदारकीच्या निवडणुकीतील जय पराजयाचे पडसाद येथील राजकारणावर खोलवर उमटण्याची शक्‍यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्याही राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान पार पडले असून एकूण १३ उमेदवार रिंगणात आहेत. तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट-भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट-शेकाप महाआघाडीचे अनंत गीते यांच्यात खरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२०१४ मध्ये गीतेंच्या बाजूने कौल
२०१४ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांचा केवळ २,१०० मतांनी निसटता पराभव केला होता. त्या वेळी १५ लाख ३२ हजार एकूण मतदारांपैकी नऊ लाख ५८ हजार मतदारांनी मतदान केले होते. तिरंगी लढतीत गीते यांना तीन लाख ९६ हजार तर सुनील तटकरे यांना तीन लाख ९४ हजार मते मिळाली होती. शेकापचे रमेश कदम यांना एक लाख २९ हजार मते होती. बसपा, आप व दोन अपक्षांनी सुमारे ३५ हजार मते घेतली होती. त्यामुळे मतविभागणी होऊन अटीतटीच्या लढतीत अनंत गीते विजयी झाले होते.

२०१९ मध्ये तटकरेंचा विजय
२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते यांचा ३१ हजार मतांनी पराभव केला होता. यावेळी तटकरे यांना शेकापची साथ होती. ही लढत दुरंगी झाली होती. १६ लाख ५१ हजार मतदारांपैकी १० लाख २० हजार इतके मतदान झाले होते. यातील सुनील तटकरे यांना चार लाख ८६ हजार तर युतीचे अनंत गीते यांना चार लाख ५५ हजार मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने २३ हजार मते घेतली होती. मतविभागणीमुळे दिग्गज उमेदवारांची विजयी मतांचा आकडा गाठताना चांगलीच दमछाक झाली होती.

२०२४ चा कौल कोणाला
२०२४ च्या निवडणुकीत १० लाख ९ हजार ५६३ इतके मतदान झाले आहे. मागील निवडणुकीपेक्षा आताच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरली असून उमेदवारही जास्त आहेत. यात वंचित बहुजन आघाडी, भारतीय जवान किसान पार्टी व नऊ अपक्ष उमेदवार आहेत. नामसाधर्म्याचे तीन उमेदवार आहेत. मागील दोन निवडणुकांमध्ये नोटा १० हजारांपर्यंत मतदान झाले आहे. यावेळी मत विभागणी दिसून येणार असून महायुतीचे उमदेवार सुनील तटकरे आणि महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना विजयापर्यंत पोहोचण्यासाठी पावणे पाच लाख ते पाच लाख मतांचा आकडा गाठावा लागणार आहे. कोणता उमेदवार पाच लाख मतांचा पल्ला गाठतो, यासाठी सर्वांचेच मतमोजणीकडे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com