नालेसफाईची बहुतांशी कामे पूर्ण

नालेसफाईची बहुतांशी कामे पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : ठाणे महापालिका क्षेत्रातील बहुतांश मोठे आणि छोटे नाले, गटारे यांची सफाई पूर्ण होत आली आहे. दररोज वाहून येणारा तरंगता कचरा काढण्याचे काम दैनंदिन स्वरूपात केले जात आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी राव यांनी सोमवारी (ता. ३) सकाळी केली.
महिनाभरापासून नालेसफाई सुरू आहे. सर्व प्रभागांत विविध एजन्सीच्या माध्यमातून नालेसफाई करण्यात आली आहे. त्यावर घनकचरा विभाग आणि वरिष्ठ अधिकारी यांची देखरेखही होत आहे. मी स्वत: वेगवेगळ्या भागातील नाल्यांच्या कामांची पाहणी केलेली आहे. काही ठिकाणी जिथे नाल्यांची तोंड बंद होतात, तिथे जाळ्या लावून ठराविक काळाने तरंगता कचरा काढण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह विनाअडथळा सुरू राहील, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. नाल्यांच्या पाहणीदरम्यान काही ठिकाणी गटारांचे रुंदीकरण, नाल्यांचे बळकटीकरण अशी अल्प आणि दीर्घ मुदतीचे कामे हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता त्या दृष्टीने अल्प आणि दीर्घ मुदतीत करायच्या उपाययोजनांचे नियोजन सुरू आहे. अल्प मुदतीतील कामांचे नियोजन पावसाळ्याच्या काळात करण्यात येईल. पावसाळा संपल्यानंतर त्यावर कार्यवाही केली जाईल, असे राव यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर दीर्घकालीन उपायांसाठी आता पूर्ण महापालिका क्षेत्राचा पूर कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. नागरीकरणाचा वेग, वाहतुकीची व्यवस्था आणि विकासकामांमुळे लोकसंख्येची घनताही वाढत आहे. त्यामुळे जुने नाले, नैसर्गिक नाले आता अरुंद होत आहे. त्यांचा नव्याने अभ्यास करण्यात येणार आहे. त्यातील अडथळे दूर करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची गरज असून त्यावर दीर्घकालीन उपाय केले जातील. त्याचेही नियोजन सुरू केले आहे. उदाहरणार्थ, जुन्या ठाण्यातील जांभळी नाका येथील पेढ्या मारुती मंदिराचा परिसर हा सखल भाग आहे. तिथे बशीसारखा आकार झाला आहे. सगळे रस्ते तिथे एकत्र येतात. पावसाचे पाणी सगळीकडून येथे येते. गटाराचे चेंबर्स अरुंद आहेत. खाडीकडे पाणी वाहून नेणारा आउटलेटही अरुंद झाला आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या परिस्थितीवर उपाय करण्यासाठी एकात्मिक योजना तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी आयआयटी, आपले सल्लागार, वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी या सगळ्यांची चर्चा करून दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येईल, असेही आयुक्त राव यांनी सांंगितले.

या ठिकाणांची पाहणी
वृंदावन सोसायटी ऋतू पार्क येथील नाला, राबोडी-रुस्तमजी येथील नाला, के व्हिला येथील कारागृहालगतचा नाला, कोपरीमधील ब्रिम्स येथील नाला, पासपोर्ट कार्यालयालगतचा नाला, पेढ्या मारुती मंदिर परिसर यांची आयुक्त राव यांनी पाहणी केली. पेढ्या मारुती मंदिरापाशी नागरिकांशीही संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन विभाग) जी. जी. गोदेपुरे, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, सहायक आयुक्त सोपान भाईक, उपनगर अभियंता विकास ढोले, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी अधिकारी सहभागी झाले होते.

आपत्कालीन कक्ष कार्यान्वित
मॉन्सूनसाठी ठाणे महापालिकेने पूर्वतयारी केलेली आहे. त्या आधारावर आपण पावसाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत. पुढील चार महिने ४८ दिवस मोठ्या भरतीचे आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पाच ते दहा टक्के पाऊस जास्त पडणार आहे. हे एक मोठे आव्हान असेल; पण अतिरिक्त पावसाचा सामना करण्यासाठीही आपली यंत्रणा सज्ज आहे. १ जूनपासून आपला आपत्कालीन कक्ष कार्यान्वित झाला आहे. त्यात महापालिका, पोलिस, महावितरण यांचे प्रतिनिधी त्यात २४ तास उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर त्याचा सगळे एकत्रित सामना करू शकू, असा विश्वास आयुक्त राव यांनी व्यक्त केला.

मदतवाहिनी
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी ८६५७८८७१०१ या मदतवाहिनीवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com