पूराचा धोका रोखण्यासाठी कांदळवन रोपांची लागवड

पूराचा धोका रोखण्यासाठी कांदळवन रोपांची लागवड

ठाणे शहर, ता. ८ (बातमीदार) : महापुरासारख्या आपत्तीचा सामना करण्यासाठी कांदळवनाचा मोठा उपयोग होत असतो. पावसाळ्यात महापुराचा धोका कमी करण्यासाठी कांदळवन उपयुक्त ठरतात. ही गरज ओळखून कांदळवन विभागाने खाडीकिनाऱ्यावर कांदळवन प्रजातींची रोपे लावली आहेत.

ठाण्यात तापमानाचा पारा वाढला आहे. तापमान कमी करण्यासाठी आणि संभाव्य महापूर व त्सुनामीचा धोका थोपविण्यासाठी कांदळवने मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे खाडीकिनारी जास्तीत जास्त या वृक्षारोपण आणि त्यांचे संगोपन करण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. या वनांचे रक्षण होणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून महाराष्ट्र कांदळवन विभागाने ही जबाबदारी खांद्यावर घेतली आहे.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ठाणे पूर्व कोपरी खाडीकिनारी वृक्षारोपण कार्यक्रमात अनेक कांदळाच्या रोपांची लावणी खाडीनजीकच्या मोकळ्या जागेत केली आहे. यामध्ये अविसेनीय मरीना, सोनेरेशिया अल्बा, सोनेरेशिया अपेटाला, अविसेनीय ऑफीसीनालीस, अशा कांदळवर्गीय वनस्पतींचा त्यात समावेश असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे यांनी दिली. या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र ठाणे (कांदळवन) कर्मचारी, स्थानिक रहिवासी, बांदोडकर महाविद्यालयातील पर्यावरणाचा अभ्यास करणारे विद्यार्थी तसेच लायन क्लब ठाणे यांच्या सदस्यांनी सहभाग घेतला.

आपल्या आजूबाजूच्या जंगलांचे संवर्धन करणे सर्वांचे कर्तव्य आहे. सध्या ठाणे व मुंबई येथील वाढलेल्या तापमानाचा पारा बघता आपण सर्व वृक्षारोपणासारखी महत्त्वाची कृती करून पर्यावरण वाचवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरणाला पूरक अशी कामे करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- विक्रांत खाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कांदळवन विभाग, ठाणे

कांदळवन पाणी व चिखलातील प्रदूषके व अतिरिक्त पोषक घटक शोषून घेऊन खाडीच्या पाण्याची गुणवत्ता वाढवते. पाण्यात तांबे, मॅग्नेशियम, झिंकसारखे विषारी धातू मोठ्या प्रमाणात असतात. पाण्यातील हे धातू शोषून ते नष्ट करण्याचा प्रयत्न कांदळवन करते. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात शोषून घेऊन प्राणवायू देतात. त्यामुळे वातावरणातील तापमान कमी होण्यास मदत होते. जमिनीची समुद्राच्या लाटापासून होणारी धूप थांबते. समुद्राकडून येणाऱ्या लाटा रोखण्यासाठी नैसर्गिक भिंत म्हणून कांदळवन काम करते. वादळी-वाऱ्याचा वेग मोठ्या प्रमाणात अडविण्यास मदत होते. अनेक मासे, खेकडे, शंख शिंपले, किडे, पक्षी यांसारख्या जीवांच्या प्रजननासाठी जागा उपलब्ध करून देते. त्यामुळे सागरी अन्नसाखळी मजबूत होते.
- डॉ. प्रमोद साळसकर, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com