निवडणुक होताच झोपड्यांवर बुलडोजर

निवडणुक होताच झोपड्यांवर बुलडोजर

निवडणूक होताच झोपड्यांवर बुलडोझर
कुटुंबकबिला फुटपाथवर; विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांचे हाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : निवडणुका झाल्या झाल्या आमच्या झोपड्यांवर बुलडोझर फिरला, आम्हाला फक्त एक दिवसाचा अवधी दिला, आम्ही एका दिवसांत जायचे कुठे, आमच्या घरातील भांडीकुंडी, कपडे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य, जमीनदोस्त झाले, होत्याचे नव्हते झाले, ही कैफियत मांडली पवईतील भीमनगर येथील नागरिकांनी. या नागरिकांनी सध्या हिरानंदानी गार्डनसमोरील फुटपाथवर तात्पुरता आसरा घेतला आहे. आम्हाला पर्यायी घरे द्या किंवा राहत होतो त्या ठिकाणी पुन्हा पाठवा, नुकसानभरपाई द्या, अशी मागणी या नागरिकांनी केली.

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागला. त्यानंतर ५ जून रोजी पालिकेच्या भांडुप येथील विभाग कार्यालयाने नोटीस काढली. झोपड्यांची जागा खाली करण्याबाबत आम्हाला नोटीस पाठविली. ६ जून रोजी सकाळी झोपड्यांवर बुलडोझर चालवला गेला. आम्हाला काही कळण्याच्या आत आमचा झोपड्या पाडल्या. फक्त एक दिवसाची मुदत आम्हाला दिली. आम्हाला चार-आठ दिवस दिले असते तर पर्याय शोधला असता. मात्र, पावसाळ्याच्या तोंडावर आम्ही आता जायचे कुठे, मुलांच्या शाळेच्या साहित्याचे नुकसान झाले आहे. झोपड्यांचे पुरावे नष्ट झाले आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून या भागात राहत आहोत. आता होत्याचे नव्हते झाले. आम्ही आता जायचे कुठे, पाऊस कधीही सुरू होईल, आम्ही आता राहायचे कुठे, अशी कैफियत सुनीता सांगळे यांनी यावेळी मांडली. आम्ही पोलिसांवर दगडफेक केली नाही. दगडफेक केली ती बिल्डरने आणलेल्या लोकांनी. त्यामुळे आमच्यावर पोलिसांनी लाठीमार केला. यात महिला जखमी झाल्या. मुलांना आणि महिलांना पोलिसांनी मारहाण केली. त्यात ५० रहिवासी जखमी झाल्याचे नंदा गायकवाड महिलेने सांगितले. आजही पोलिस ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना, दिसेल त्या मुलांना पोलिस ठाण्यात नेत आहेत. त्रास देत आहेत. हा त्रास थांबला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

..
न्यायालयात धाव
आमचे पुनर्वसन होतो त्याच ठिकाणी झाले पाहिजे. सर्व रहिवाशांना नुकसानभरपाई दिली पाहिजे, रहिवाशांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी या रहिवाशांच्या वतीने ॲड. माधवी गायकवाड यांनी केली. येथील रहिवाशांकडे पुरावे आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून ते येथे राहत आहेत. याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा निर्णय स्थानिक रहिवाशांनी घेतला आहे.


- पालिकेचे सहायक आयुक्त आणि उपायुक्त यांना निवेदन दिले, मात्र निवेदनाची दखल घेतली नाही.
- झोपड्या पाडल्यानंतर त्या भूखंडावर पोलिस संरक्षण ठेवण्यात आले आहे. या भागाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.
- चार एकर जागेत सुमारे ६५० झोपड्या होत्या. त्या जमीनदोस्त केल्या आहेत.
- सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी, मात्र झोपडीधारकांच्या पुनर्वसनाबाबत अद्याप निर्णय नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com