मिरा-भाईंदरला पाच एमएलडी पाण्यात वाढ

मिरा-भाईंदरला पाच एमएलडी पाण्यात वाढ

भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : मिरा-भाईंदरला होत असलेल्या पाणीपुरवठ्यात १० एमएलडीची वाढ करण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर शनिवारी (ता. ८) रात्रीपासून एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यात पाच एमएलडीची वाढ झाली. गेल्या तीन दिवसांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. उर्वरित पाच एमएलडी पाणीही लवकरच मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
मिरा-भाईंदर शहराला एमआयडीसीकडून १२५ एमएलडी पाणी कोटा मंजूर आहे, मात्र हे पाणी टप्प्याटप्प्याने देण्यात आले आहे. सुरुवातीच्या काळात ५० एमएलडी पाणीच शहराला मिळत होते, मात्र वाढत्या लोकसंख्येनुसार ते कमी पडू लागल्यानंतर ७५ एमएलडी पाणी योजना स्वतंत्रपणे राबविण्यात आली. ही योजना २०१७ मध्ये पूर्ण झाली व एमआयडीसीकडून आधीचे ५० आणि नव्या योजनेच्या ७५ पैकी ५० असे सुमारे १०० एमएलडी पाणी दिले जाऊ लागले. जलवाहिन्या अनेक वर्षांपासूनच्या असल्याने त्यावर अतिरिक्त दाब देता येणार नाही, म्हणून उर्वरित २५ एमएलडी पाणी देणे शक्य होणार नाही. जलवाहिन्या बदलण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच शिल्लक पाणी दिले जाईल, असा पवित्रा एमआयडीसीने घेतला, मात्र शहराला १२५ एमएलडी पाणी मंजूर असताना १०० एमएलडी पाणीच का, अशी भूमिका घेत चार वर्षांपूर्वी सत्ताधारी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी आंदोलन छेडले होते. लोकांची आक्रमक भूमिका बघून एमआयडीसीने पाणीपुरवठ्यात आणखी १० एमएलडी वाढ करून तो ११० वर नेला होता.
दीड वर्षांपूर्वी पाणीपुरवठ्यात पाच एमएलडीने आणखी वाढ झाली, मात्र त्यानंतरही एमआयडीसीकडे हक्काचे १० एमएलडी पाणी बाकीच होते. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा उद्योगमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी उर्वरित १० एमएलडी पाणी तातडीने देण्याचे आदेश एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले. वास्तविक हे पाणी गुरुवार (ता. ६) पासून मिळणे अपेक्षित होते, मात्र एमआयडीसीने त्याचवेळी शटडाऊन घेतला होता. त्यामुळे पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी शनिवार उजाडला. या काळात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. आता शिल्लक राहिलेले पाच एमएलडी पाणीही लवकरच मिळणार आहे, मात्र हा वाढीव पाणीपुरवठा एमआयडीसीकडून कायम राहावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com