सुशोभीकरणाच्या कामामुळेच पिंपळाचे वृक्ष उन्मळून पडले

सुशोभीकरणाच्या कामामुळेच पिंपळाचे वृक्ष उन्मळून पडले

Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या किनारी शिवमंदिर परिसर सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी एक जुना भव्य असा पिंपळ वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे येथे सुरू असलेल्या कामामुळेच वृक्षाला धोका निर्माण होऊन ते पडल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करत आहेत. याप्रकरणी हिराली फाऊंडेशनच्या सरिता खानचंदानी यांनी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सरिता यांनी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडे याचिकादेखील दाखल केली आहे.

वालधुनी नदीकिनारी शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे काम सुरू आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी वालधुनी नदीच्या किनारी असलेल्या शिवमंदिराजवळ एक जुना पिंपळ वृक्ष उन्मळून पडला. हा वृक्ष पन्नास वर्षांपेक्षा अधिक असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात. या झाडाची पूजाही केली जात होती. वृक्ष उन्मळून पडल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर अंबरनाथ शहरातील जुन्याजाणत्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

सध्या वालधुनी नदीकिनारी घाटाची निर्मिती केली जात आहे. त्यासाठी येथील मोठा भाग सपाट केला आहे; मात्र येथे सुरू असलेल्या कामामुळे अनेक झाडे मुळांसकट उपटून टाकली आहेत. तसेच, या ठिकाणी बांधकाम केल्याने नदीच्या नैसर्गिक पात्राला हानी पोहोचत आहे. या कामामुळेच या वृक्षाची मुळे उखडली गेल्याचा आरोप हिराली फाऊंडेशनच्या ॲड. सरिता खानचंदानी यांनी केला आहे. संबंधित कंत्राटदाराविरुद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून नगरपालिकेमार्फत सुशोभीकरण करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शिवमंदिरजवळ वालधुनी नदीपात्रात व नदीचा किनारा येथे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात आले आहे. यासाठी नगर परिषदेने नदीपात्रातील सुमारे ५० वर्षांहून अधिक जुन्या वृक्षांची तोड केली आहे. याठिकाणी अनधिकृतपणे होत असलेल्या कॉंक्रीटीकरणाबाबत पुरातत्त्व विभाग, पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जी.एस.डी.ए. विभाग पुणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलिस आयुक्त ठाणे, अंबरनाथ नगर परिषदेकडे केली आहे; मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने मानव अधिकार आयोग मुंबई येथे याचिका दाखल केली आहे.
-ॲड. सरिता खानचंदानी, याचिकाकर्त्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.