वसई-विरार शहरात कोंडी

वसई-विरार शहरात कोंडी

Published on

वसई-विरार शहरात कोंडी
पावसाळ्यात खड्ड्यांचे जाळे : अपघाताचा धोका
वसई, ता. ३ (बातमीदार) : पावसाळ्याला सुरुवात होताच वसई-विरार शहराला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. खड्ड्यांमुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असून शाळकरी मुलांसह चाकरमानी त्रस्त आहेत. अशातच अपघाताची भीती व्यक्त होत असल्याने पालिका प्रशासनाने रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
वसई-विरार शहरात दरवर्षीच पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते. खड्ड्यांमुळे होत असलेल्या कोंडीचा अत्यावश्यक सेवांनादेखील फटका बसू लागला आहे. ठिकठिकाणी रस्त्याची चाळण झाली असून वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. वसईच्या औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गालाही खड्ड्यांनी विळखा घातला आहे. वालीव, सातिवली, गोखिवरे फादरवाडी, रेंज नाका, गोलानी मार्ग येथे मोठ्या आकाराचे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या अगदी तीव्र होत चालली आहे. वाहनांना खड्ड्यातून वाट काढणे, मुश्कील झाले आहे.

एकीकडे महापालिका हद्दीत पर्यायी मार्गाची व्यवस्था नसल्याने रस्ते वाहतुकीवर पूर्ण शहर अवलंबून आहे. त्यातच काही प्रमाणात पाऊस पडल्यावर शहरातील रस्ते नादुरुस्त होतात. महापालिकेने पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी नालेसफाई, गटारेसफाई केली आहे. वाहतूक विस्कळित होऊ नये, यासाठी रस्त्यांची उंची वाढवली आहे; मात्र खड्डे समस्या जैसे थे अशीच आहे. दरवर्षी पावसाळ्यात हे खड्डे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे, तसेच यामुळे अपघाताची शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे. वसई-विरार महापालिका कोट्यवधींची विकासकामे करत आहे; मात्र ऐन पावसाळ्यात रस्ते मार्ग मात्र खड्डेयुक्त होतात. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

चाकरमान्यांना त्रास
चाकरमानी वर्ग हा मुंबई, ठाणे परिसरातून वसई-विरार शहरात ये जा करत आहे; मात्र खड्डे असल्याने कोंडी होत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांची गती मंदावत असल्याने चाकरमान्यांना घरी व कारखान्यात पोहोचण्यास उशीर होत आहे. अद्याप तीन महिने पाऊस पडणार आहे, त्यामुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे महापालिकेने उपाययोजना करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

अत्यावश्यक सेवांना फटका
अग्निशमन सेवा, रुग्णवाहिका, तसेच इस्पितळात जाणारे डॉक्टर आदींना कोंडीचा फटका बसत आहे. परिणामी त्यांना गंतव्यस्थानी पोहोचण्यास उशीर होत आहे. या जीवघेण्या खड्ड्यांतून मार्ग काढताना नाकीनऊ येत आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहने सावकाश चालवावी लागत आहेत. वसई-विरार महापालिकेने रस्त्यांची दुरुस्ती केली तर चाकरमान्यांना दिलासा मिळेल, तसेच प्रवास सुखकर होईल, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अन्यथा दुर्घटना होऊ शकते.
रॉबी रेमेडीयस, प्रवासी, वसई

वसई-विरार शहरात ज्या मार्गावर खड्डे अधिक आहेत. त्याची पाहणी संबंधित प्रभागात केली जाईल, त्यानुसार रस्ते दुरुस्ती करण्यात येईल. नागरिकांना त्रास होणार नाही, याची प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येईल.
प्रकाश साटम, कार्यकारी अभियंता, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.