बत्ती गुलमुळे रात्र अंधारात

बत्ती गुलमुळे रात्र अंधारात

Published on

पालघर, ता. ४ (बातमीदार) : केळवेसह परिसरातील गावांमध्ये २० दिवसांपासून वीजपुरवठा नेहमीच खंडित होत आहे. याआधीही उन्हाळ्यात वीज खंडित होत असल्याने रात्रीच्या वेळी उकाड्याचा त्रास सहन करावा लागायचा, यामुळे अनेकांची झोपमोड व्हायची. आता पावसाळा सुरू झाल्यानंतरही वीजपुरवठा खंडित होऊ लागला आहे. येथील नागरिक आणि विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोईंना सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रार करूनही यात सुधारणा होत नसल्याने ग्राहक संताप व्यक्त करत आहेत.
केळवे परिसर बागायती क्षेत्र व पर्यटन केंद्र असल्याने येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. शनिवार, रविवारी तर अनेक पर्यटक एक दिवसाच्या वस्तीला येतात. मात्र, वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्यांचे हाल होत आहेत. रात्रीच्या वेळी वीज खंडित झाल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी दहानंतर महावितरणचे कर्मचारी कार्यालयात आल्यानंतर तक्रारी पाहून दुरुस्तीवर जात असतात. त्यामुळे वेळेवर वीजपुरवठा सुरूच होत नाही. नेहमीच वीज खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच मुंबई, गुजरातकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. पावसाळा असल्याने रस्त्याला सापांची भीती असते. अशा वेळी अंधारात मार्ग काढून रिक्षा, बस पकडावी लागत आहे. महावितरणने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. वीजपुरवठा खंडित होणार नाही, यावर उपाययोजना करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

केळवे परिसरात वीस दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. याविषयी महावितरणकडे तक्रार करूनही लक्ष दिले जात नाही. अनेकदा वीज खंडित झाली की रात्र जागून काढावी लागते. रात्रीच्या वेळी कर्मचारी नसल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी दहानंतरच येतात. तेव्हा वीजपुरवठा सुरू केला जातो. पण तोही एक ते दोन तास टिकतो. नंतर पुन्हा खंडित होतो. यावर कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक आहे. महावितरणने लक्ष दिले नाही, तर लोकांमध्ये असंतोष पसरून आंदोलन होण्याची शक्यता आहे.
- ॲड. प्रथमेश तेंडुलकर, केळवे


केळवे हे बागायती क्षेत्र असल्याने येथे नारळ आणि इतर झाडे आहेत. त्यामुळे नारळाचे झाप विद्युत तारेवर पडून पुरवठा खंडित होत आहे. पावसाळ्यात नारळाचे झाप नेहमीच पडत असतात. सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. काही दिवसांनी वीजपुरवठा नियमित सुरू होईल.
- निखिल बिरनाळे, उपअभियंता, केळवे विभाग महावितरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.