वसई-नालासोपारा महिलांसाठी असुरक्षित

वसई-नालासोपारा महिलांसाठी असुरक्षित

Published on

विजय गायकवाड
नालासोपारा, ता. ४ (बातमीदार) : वसई-विरार, नालासोपारा परिसरात महिलांच्या हत्या, विनयभंग, प्राणघातक हल्ल्याच्या घटना दिवसागणिक वाढत जात आहेत. या तिन्ही शहरांत मागच्या १५ दिवसांत वेगवेगळ्या कारणांवरून तीन महिलांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. एका उच्च शिक्षित महिलेचा विनयभंग आणि एकीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यातील एक हत्या प्रेम प्रकरणातून, दुसरी हत्या कौटुंबिक वादातून आणि तिसरी हत्या विवाहबाह्य संबंधातून झाली आहे.

विरारमधील पतीचा प्राणघातक हल्ला कौटुंबिक वादातून झाला आहे; मात्र वसई स्थानक परिसरातील ३२ वर्षीय उच्च शिक्षित महिलेचा विनयभंग वासनांध विकृतीतून झाला आहे. या सर्व घटना अतिशय माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. तर दुसरीकडे कायदा- सुव्यस्थेवर प्रश्नचिन्हही निर्माण करत आहेत. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या वसई-विरार, नालासोपारा शहराला या घटनांनी एक विकृत गुन्हेगारीचा कलंक लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील महिन्यात १८ जून रोजी वसईत आरती यादव या तरुणीची तिच्या प्रियकराने भररस्त्यात सकाळी साडेआठ वाजता लोखंडी पान्याने डोक्यात १६ वार करून निर्घृणपणे हत्या केली. या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता. हत्या होत असताना ५०च्या वर कामावर जाणारे नागरिक हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत होते; पण कोणीही राक्षसी अवतार धारण केलेल्या आरोपी प्रियकराला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. हत्येचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात अनेकांनी कैद केला. इतकी माणुसकी मेली होती का, हा प्रश्न आरती यादव हत्याकांडाने निर्माण झाला आहे. वालीव पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अनेकांचे जबाब घेतले; मात्र आरती यादवचा निष्पाप गेलेला जीव परत येणार नाही.

आरतीच्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोवरच १९ जून रोजी विरारमध्ये कौटुंबिक वादातून लक्ष्मी खांबे या महिलेची तिच्या जावयानेच दारूच्या नशेत निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर २५ जूनला पाचव्या दिवशी विवाहित महिलेची विवाहबाह्य संबंधातून तिच्या प्रियकराने ओढणीने गळा आवळून तिच्या राहत्या घरातच हत्या केली.

भटक्या श्वानामुळे वाचले प्राण
आठवडाभरातील तीन हत्यांनंतर ३० जूनला मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास नेहमीप्रमाणे ३२ वर्षांची चार्टर्ड अकाउंट महिला कामावरून घरी जात होती. यावेळी एका वासनांध नराधमाने दारूच्या नशेत वसई स्थानक परिसरात तिला अडवून जबरदस्तीने विनयभंग केला. तिचा मोबाईल हिसकावून घेतला; मात्र एक भटका श्वान तिचा पाठीराखा म्हणून भुंकत आल्याने पीडित महिलेने संधी साधून नराधमाच्या मगरमिठीतून आपली सुटका करून तिथून पळ काढला. महिलेच्या धाडसी प्रसंगावधानामुळे तिचा जीव आणि तिच्यावरील अतिप्रसंग वाचला आहे. यात ती किरकोळ जखमी झाली. या घटनेचा माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

कौटुंबिक वादातून हल्ले
जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच बुधवारी (ता. ३) सकाळी साडेसातच्या सुमारास विरार रेल्वे स्थानकाच्या ब्रिजवर कामावर जाणाऱ्या पत्नीला पतीने अडवून कौटुंबिक वादातून तिच्या गळ्यावर, हातावर धारदार चाकूने वार केले. तसेच तिचा गळा आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला; पण कामावर जाणाऱ्या प्रवाशांनी तत्काळ आरोपी पतीला प्रतिकार केल्याने महिलेचा जीव वाचला आहे. यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गुन्ह्यात आरोपी पतीला अटक केली आहे. कौटुंबिक वाद, प्रेम प्रकरण, हत्या, मारामारी, मानसिक छळ या घटनांचा आलेख वाढला आहे. घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल होतो, आरोपींना अटक होते. रागाच्या भरात घटना घडतात; मात्र अशा घटनांमुळे त्यांच्यावर विसंबून असलेले कुटुंब, निष्पाप मुले, म्हातारे आई-वडील हे देशोधडीला लागतात.

महिलांच्या बाबतीत पोलिस सर्वच तक्रारींचे निवारण करतात. प्रत्येक पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी महिलांच्या तक्रारीत लक्ष घालून त्यांचे समुपदेशन करतात. घरातील कौटुंबिक वाद उग्ररूप धारण करू शकतात, असे वाटत असेल तर आम्हाला कळवा, अशा आम्ही सोसायटीधारकांनाही सूचना केल्या आहेत. पोलिस गस्तही वाढवली आहे; मात्र हल्ली आपले अधिकार अबाधित ठेवण्यासाठी छोट्या वादातून अघटित घटना घडत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या रागावर नियंत्रण मिळविले, तर अशा घटना घडणार नाहीत.
-जयंत बजबळे, पोलिस उपायुक्त, मिरा-भाईंदर वसई-विरार परिमंडळ ०३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.