कल्याण-शीळ रोडवरील मेट्रोचे नियोजनशून्य काम

कल्याण-शीळ रोडवरील मेट्रोचे नियोजनशून्य काम

Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ८ : ऐन पावसाळ्यात एमएमआरडीएने कल्याण-शीळ रोडवरील मेट्रोचे काम हाती घेतले आहे. या रस्त्याचे नुकतेच सिमेंट काँक्रीटीकरण आणि दुभाजकांवर झाडे लावली आहेत. नव्याने तयार केलेला हा रस्ता मेट्रोच्या कामासाठी खोदण्यात आला असून, झाडे तोडून तेथे खांब उभारले जात आहेत. यामुळे या कामावर खर्च केलेला निधी वाया गेला आहे. तसेच, रस्त्यावर वाहतूक कोंडीही वाढली आहे. त्यामुळे मेट्रोचे हे काम त्वरित थांबवावे, अशी मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत उपस्थित करत सरकारचे याकडे लक्ष वेधले.
कल्याण ग्रामीण विधानसभेत सुरू असलेल्या विकासकामांच्या नियोजन शून्य कामांचा आमदार पाटील यांनी पाढा वाचून सरकारचे लक्ष वेधले आहे. सरकारच्या यंत्रणांकडून नियोजनाअभावी सुरू असलेल्या कामांमुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. यात प्रामुख्याने २७ गावांची न्यायालयीन लढाई, रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे, यासह मेट्रोचे सुरू असलेले काम, १४ गावांतील सरकारच्या नियोजनशून्य कामाचा गोंधळ याबद्दल शुक्रवारी (ता. ५) पाटील यांनी विधानसभेत सरकारला जाब विचारला.
केडीएमसीसह ठाणे पालिका क्षेत्रात शासकीय यंत्रणांकडून कामे सुरू आहेत. यात प्रामुख्याने केडीएमसी क्षेत्रातील २७ गावांसाठी अमृत योजनेचे काम सुरू आहे; मात्र पालिका आणि एमएमआरडीए यांच्यात समन्वय नसल्याने जलवाहिन्या, तसेच गटार कामांसाठी रस्त्याचे पुन्हा खोदकाम केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडात २७ गावांची विभागणी सरकारने केली होती. यात प्रामुख्याने महसूल देणारी गावे पालिका क्षेत्रात ठेवत उर्वरित गावांचा समावेश स्वतंत्र नगरपालिकेत केला. यामुळे २७ गावांची स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्याची मागणी आमदार पाटील यांनी विधानसभेत केली आहे.

पाण्याचे नियोजन आवश्यक
एमएमआर क्षेत्रात सध्या गृहसंकुलांच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यात प्रामुख्याने एमएमआरडीए आणि म्हाडाचा समावेश अधिक आहे. त्यामुळे या परिसरासाठी स्वतंत्र धरणाच्या नियोजनाची मागणी आमदार पाटील यांनी विधानसभेत केली आहे. केडीएमसी क्षेत्रातील अनेक गावांत सध्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये मोठमोठ्या गृहसंकुलांच्या प्रकल्पांचाही समावेश आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आंदोलने करावी लागत आहेत. या अनागोंदी कारभाराला विधानसभेत पाटील यांनी वाचा फोडली आहे.

भूसंपादनअभावी रखडले काम
कल्याण-शीळ रस्त्याचे काम भूसंपादनअभावी रखडले आहे. एमएसआरडीसीकडून अजूनही रस्तेबाधितांना मोबदला मिळालेला नाही. रस्त्याचे काम थांबलेले असल्याने दररोज वाहतूक कोंडीची समस्या उद्‍भवत आहेत. रस्तेबाधित भूमिपुत्रांना बाधित रक्कम ३०० कोटी ९१ लाख ९१ हजार ७१५ रुपये देणे बाकी आहे. ती रक्कम तातडीने स्थानिक शेतकऱ्यांना देऊन रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.