आता डायलिसिसची चिंता नको

आता डायलिसिसची चिंता नको

Published on

जव्हार, ता. ९ (बातमीदार) : दोन्ही मूत्रपिंडे कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपात निकामी झालेल्या रुग्णांना डायलिसिस करण्याशिवाय पर्याय नसतो. संबंधिताला तातडीने डायलिसिस उपचार पद्धतीचा वापर करणे आवश्यक असते. अन्यथा, संबंधित रुग्णाच्या जीवाला धोका असतो. पालघर जिल्ह्यात जव्हार व डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस उपचार मोफत मिळत असल्याने अनेक रुग्णांना त्याचा लाभ होत आहे.
किडनीचा विकार असलेल्या अनेक रुग्णांना आठवड्यातून दोन ते तीन दिवस हिमोडायलिसिस करावे लागते. महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेतून लाभार्थी रुग्णांना जव्हार येथील पतंग शाह उपजिल्हा रुग्णालय आणि डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिसची सुविधा असल्यामुळे किडनी आजाराच्या रुग्णांना दिलासा मिळत आहे. येथील डायलिसिस केंद्रात दररोज रुग्ण दाखल होत असतात. तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार केले जातात. विशेष म्हणजे, पालघर जिल्ह्याबरोबर ठाणे जिल्हा व गुजरात सीमेवरील काही रुग्णही येथे येत असतात. पालघर जिल्ह्यातील जव्हार उपजिल्हा रुग्णालय आणि डहाणू येथील शासकीय रुग्णालयात डायलिसिसवर उपचार होत आहे. इतर कोणत्याही शासकीय रुग्णालयात ही व्यवस्था नाही. त्यामुळे जव्हार व डहाणू येथे गरीब रुग्ण नेहमी येत असतात.

डायलिसिस कसे ठरते उपयुक्त?
१. धूम्रपान, जीवनशैलीत बदल व इतर कारणांमुळे किडनीचे आजार होतात. अशा आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी डायलिसिस करावे लागते. डायलिसिस शरीरातून टाकाऊ पदार्थ, विषारी पदार्थ व अतिरिक्त द्रव काढून टाकण्यास मदत करते. अन्यथा गुंतागुंत होते.
२. मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्रस्त असलेल्या रुग्णाला डायलिसिस केल्यावर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास चांगले योगदान देते. तसेच हृदय आणि फुप्फुसावरील ताण कमी करण्यास मदत होते. टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यास मदत झाल्याने भूक सुधारते आणि योग्य पोषण राखता येते.

आवश्यकता कधी?
मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी रक्तातून पुरेसा कचरा आणि द्रव काढून टाकत नसेल, अशा वेळी संबंधित रुग्णाला डायलिसिसची आवश्यकता असते. जेव्हा व्यक्तीमध्ये १० ते १५ टक्के मूत्रपिंडाचे कार्य शिल्लक असते आणि तिला मळमळ, उलट्या, सूज आणि थकवा यांसारखी लक्षणे दिसू लागतात, अशा वेळी डायलिसिस फायद्याचे ठरते.

डायलिसिस कोणाला लागते?
मूत्रपिंडाच्या आजारामुळे थकवा, धाप लागणे, सूज येणे, उच्च रक्तदाब यांसारखी लक्षणे दिसू लागतात. मूत्रपिंड व्यवस्थित काम करत नसलेल्या रुग्णाला डायलिसिस करावे लागते. डायलिसिसमुळे मूत्रपिंडाचे उर्वरित कार्य टिकवून ठेवण्यास मदत होते.

खासगी रुग्णालयात खर्च किती?
पालघर जिल्ह्यात अनेक खासगी रुग्णालयात डायलिसिसची सुविधा आहे. येथे एका डायलिसिससाठी जवळपास एक लाखाचा खर्च येतो. हा खर्च सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील रुग्णांना परवडत नाही.

शासकीय रुग्णालयात मोफत
जव्हार व डहाणू येथील रुग्णालयात रीनल प्रोजेक्टअंतर्गत डायलिसिसची सुविधा मोफत उपलब्ध आहे. या रुग्णालयात नेहमी रुग्ण असतात. अनेकांना डायलिसिस केले जाते. अलीकडे खानपानाच्या चुकीच्या सवयींमुळे किडनीचे विकार वाढत असल्याचे दिसून येते.

पाच महिन्यांतील रुग्ण
जव्हार येथील रुग्णालयात गेल्या पाच महिन्यांत सरासरी ९३ रुग्णांचे डायलिसिस केले आहे. तर, डहाणू येथील रुग्णालयात दैनंदिन तीन ते चार रुग्णांना डायलिसिस केले जाते. गेल्या पाच महिन्यांत ४६४ जणांना डायलिसिसचा लाभ देण्यात आला.

पालघर जिल्ह्यात जव्हार व डहाणू येथे डायलिसिस सुविधा उपलब्ध आहे. डायलिसिस सुविधा मोफत असल्याने रुग्णांना ही आरोग्य व्यवस्था लाभदायक ठरत आहे.
- डॉ. रामदास मराड, शल्यचिकित्सक, पालघर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.