मुख्य आरोपी मिहीर शहा अटकेत

मुख्य आरोपी मिहीर शहा अटकेत

Published on

(सुधारित)
मुख्य आरोपी मिहीर शहा अटकेत
मित्राने मोबाईल सुरू करताच जागा समजली
वरळी ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरण

मुंबई, ता. ९ ः वरळी येथील ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणात महिलेचा जीव घेतल्यानंतर दोन दिवस पोलिसांना गुंगारा देणारा मुख्य आरोपी मिहीर शहा (वय २४) याला मंगळवारी (ता. ९) विरार फाटा येथून बेड्या ठोकण्यात आल्या. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी मिहीर याच्या अटकेच्या वृत्तास दुजोरा दिला.
तपासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर वांद्र्याच्या कलानगर येथून गोरेगावला गेलेला मिहीर आई, दोन बहिणी आणि एका मित्रासोबत मर्सिडीज कारने शहापूर येथे एका रिसॉर्टवर जाऊन लपले. अपघात घडलेल्या ठिकाणापासून बोरिवली येथील मिहीरच्या घरापर्यंत असलेले सीसीटीव्ही फुटज पोलिस बारकाईने तपासत होते. त्यात मिहीर पसार झालेल्या मर्सिडीजचा माग पोलिसांनी काढला. पोलिस रविवारीच शहापूर येथील रिसॉर्टवर पोचले; मात्र तोवर मिहीर तेथून पसार झाला होता. या रिसॉर्टवर मिहीरची आई वीणा, बहिणी पूजा व किंजल आणि मित्र अवनीत एव्हढीच मंडळी होती. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनाही मिहीर या रिसॉर्टवरून कधी बाहेर पडला, कुठे गेला याचा थांगपत्ता नव्हता. पोलिस मिहीरचा थांगपत्ता लावण्यासाठी त्याच्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तींच्या हालचाली, मोबाईलवरील संभाषण आदींवर पाळत ठेवून होते. मिहीरच्या एका मित्राचा मोबाईल मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास विरार फाट्याजवळ अवघ्या १५ मिनिटांसाठी सुरू झाला. पोलिसांनी हा धागा पकडून तातडीने विरार फाटा गाठला. तेथे मिहीर आपल्या मित्रासोबत पुढल्या प्रवासाला निघण्याच्या तयारीत होता. याच मित्राने शहापूर येथून मिहीरला विरार येथे आणले होते. मिहीरला पळवून लावल्याबद्दल किंवा सहकार्य केल्याबद्दल त्याची आई, दोन बहिणी आणि मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीला अटकेपासून वाचविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केल्याबद्दल गुन्हा नोंद होऊ शकेल. मिहीरच्या शोधमोहिमेत वरळी पोलिस आणि गुन्हे शाखेची एकूण १८ पथके सहभागी होती.
...
चालकाला कोठडी
अपघात घडला तेव्हा मिहीरसोबत गाडीत हजर असलेला शहा कुटुंबीयांचा वाहनचालक राजऋषी बिडावत याला मंगळवारी (ता. ९) शिवडी येथील दंडाधिकारी न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत धाडले. अपघाताआधी व नंतर घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींबाबत तपास करून पुरावे गोळा करायचे आहेत; मात्र बिडावत नेमकी माहिती देत नाही. तसेच तो पोलिसांची दिशाभूल करतो आहे, असा संशय असून त्याला व मिहीरला समोरासमोर बसवून चौकशी करणे क्रमप्राप्त आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी न्यायालयासमोर केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने बिडावत याला ११ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
...
घटनाक्रम असा
- शनिवारी रात्री तीन मित्रांसोबत मिहीर याने मद्यप्राशन आणि जेवण केले. रात्री ११.१५च्या सुमारास हे चौघे या बारमधून बाहेर पडले. अपघात घडलेल्या बीएमडब्ल्यूमध्ये बसले. ही गाडी बोरिवलीच्या दिशेने निघाली.
- बोरिवली परिसरातच राहणाऱ्या तिन्ही मित्रांना घरी सोडल्यावर रात्री ३.३० वाजता मिहीरने चालक बिडावत याच्याकडे लाँग ड्राईव्हला जाण्याची इच्छा व्यक्त केली.
- गाडी मरीन ड्राईव्ह परिसरात आली. तेथून परत घरी जाताना मिहीरने गाडी चालविण्यास घेतली. पहाटे साडेपाचच्या सुमारास वरळी येथे मिहीरच्या गाडीने प्रदीप व कावेरी नाखवा यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. धडकेमुळे दोघे बीएमडब्ल्यू कारच्या बोनेटवर आले. त्याच वेळी मिहीर याने ब्रेक दाबला. या झटक्यामुळे प्रदीप डाव्या बाजूने खाली पडले; मात्र कावेरी यांची साडी चाकात गुरफटली. त्यामुळे त्या बोनेटवरून सरकून चाक आणि बंपरमध्ये अडकल्या.
- याची जाणीव कार चालविणाऱ्या मिहीरला आणि पेशाने चालक असलेल्या बिडावत याला होती; तरी त्याच अवस्थेत दोन किलोमीटर अंतर कापल्यावर मिहीरने गाडी थांबवली. चालकाच्या मदतीने कावेरी यांना बाहेर काढले. रस्त्यावर ठेवले. तेथे चालकाने गाडीचा ताबा घेतला. त्याने कावेरी यांच्यावरून पुन्हा गाडी चढवत पुढे नेली.

- ही गाडी वांद्रे कलानगर येथे बंद पडली. तत्पूर्वी मिहीरने शिवसेनेचे उपनेते असलेल्या आपल्या वडिलांना म्हणज राजेश शहा यांना फोन करून सर्व हकिगत सांगितली; मात्र मिहीरला पोलिस ठाण्यात पाठवण्याऐवजी शहा यांनी पळून जाण्याचा सल्ला दिला. तसेच अपघाताची जबाबदारी चालक बिडावत याच्यावर ढकलण्याचा कट आखला. शहा यांनी या गुन्ह्यात महत्त्वाचा पुरावा असलेली कारही गायब करण्याचा बेत आखला होता; मात्र वेळेत पोचलेल्या पोलिसांनी तो उधळला.
- कलानगर येथून काही अंतर पायी गेल्यानंतर मिहीर याने रिक्षा पकडली. सीसीटीव्ही चित्रणातून ही माहिती पोलिसांना मिळाली आहे. कलानगर येथून तो गोरेगाव येथे राहणाऱ्या प्रेयसीच्या घरी गेला. तेथे सुमारे दोन तास त्याने झोप काढली. त्यानंतर तेथे आलेल्या बहिणीने मिहीर याला आपल्यासोबत नेले. गोरेगाव येथून तो बोरिवली येथे आपल्या घरी गेला. त्यानंतर मिहीर, त्याची आई, बहीण बेपत्ता झाले. तिघांनी आपापले फोनही बंद केले होते.
- रविवारी सकाळी वरळी पोलिसांनी शहा आणि बिडावत यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री या दोघांना अटक करण्यात आली.
मिहीरसाठी देशभरातील विमानतळांना लूकआऊट नोटीस देण्यात आली. मिहीरच्या शोधार्थ विविध पथके तयार केली गेली.
...
मिहीरबाबत प्रश्न
१ मित्रांना घरी सोडल्यानंतर अपघात होईपर्यंत काय काय केले? पोलिसांना संशय आहे की, मित्रांना घरी सोडल्यानंतर मिहीर आणखी दारू प्यायला किंवा अमली पदार्थांचे सेवन केले. तो वरळी, कुलाबा किंवा दक्षिण मुंबईतील पब, सोशल क्लबमध्ये गेला.
२ दुचाकीला धडक दिल्यानंतर गाडी का थांबवली नाही?
३ कलानगर येथून पसार झाल्यानंतर अटक होईपर्यंत कुठे होता, कोणासोबत होता आणि या दोन दिवसांत त्याने काय काय केले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.