अदानी विरोधात काँग्रेसचा आज धडक मोर्चा

अदानी विरोधात काँग्रेसचा आज धडक मोर्चा

Published on

अदाणीविरोधात काँग्रेसचा आज धडक मोर्चा

चेंबूर, ता. १० (बातमीदार) : महागाईने जनता त्रस्त असताना महायुती सरकारने वीज दरवाढ करून जनतेचे कंबरडे मोडले आहे. ही दरवाढ केवळ सात टक्के असल्याचा सरकारचा दावा असला तरी प्रत्यक्षात मात्र ही दरवाढ ३० टक्के आहे. त्यामुळे ही मोठी दरवाढ जनतेला परवडणारी नाही. त्याचबरोबर वीज दरवाढीबरोबरच सरकारने स्मार्ट मीटर बसवण्याचाही निर्णय घेतला आहे. या स्मार्ट मीटरमधून अदानी उद्योग समूहाचा फायदा होणार असून जनतेचे मात्र दिवाळे निघणार आहे. या दरवाढीविरोधात काँग्रेसचा आज (ता. ११) धडक मोर्चा निघणार आहे.
काँग्रेस पक्षाचा स्मार्ट मीटर व वीज दरवाढीला विरोध असून सरकारने दोन्ही रद्द करावे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. सरकार जनतेला महागाईच्या खाईत लोटत आहे. स्मार्ट मीटरला जनतेचाही तीव्र विरोध असूनही केवळ अदानीचे खिसे भरण्यासाठी सरकारने स्मार्ट मीटर आणल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे, तर मुंबईत १० लाख स्मार्ट मीटर बसवणे व त्याच्या मेंटेनन्सचा ठेका अदाणी समूहाला मिळाला आहे. या स्मार्ट मीटरमुळे मीटर रिडिंगचे काम करणाऱ्या हजारो लोकांच्या रोजगारावरही गदा येणार आहे. त्यामुळे या वीज दरवाढ व स्मार्ट मीटरविरोधात मुंबई काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (ता. ११) दुपारी २ वाजता बीकेसीमधील अदानी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार असल्याचे खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.