भाईंदरमधील सरकारी सेतू सुविधा केंद्र अखेर सुरू

भाईंदरमधील सरकारी सेतू सुविधा केंद्र अखेर सुरू

Published on

भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले भाईंदरच्या अतिरिक्त तहसीलदार कार्यालयातील आपले सरकार सेतू सुविधा केंद्र अखेर सुरू झाले आहे. हे केंद्र बंद असल्याने नागरिकांना विविध दाखल्यांसाठी खासगी महा ई-सेवा केंद्रांकडे जावे लागत होते व त्या ठिकाणी त्यांची आर्थिक लुबाडणूक केली जात होती, मात्र आता हे केंद्र पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अतिरिक्त तहसीलदार कार्यालयातील आपले सरकार सेतू सुविधा केंद्र एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर तडकाफडकी बंद करण्यात आले. या केंद्रात सरकारी शुल्कात उत्पन्न, अधिवास, क्रिमिलियर आदी दाखले, त्याचप्रमाणे जात प्रमाणपत्र मिळत असे, मात्र केंद्र बंद झाल्यानंतर नागरिकांना खासगी महा ई-सेवा केंद्राकडे धाव घ्यावी लागत होती. त्या ठिकाणी दाखल्यांसाठी अव्वाच्या सव्वा शुल्क वसूल केले जात होते. आपले सरकार सेतू सुविधा केंद्र बंद असल्याबद्दल अनेक तक्रारी तहसीलदार कार्यालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात झाल्या होत्या, मात्र केंद्र पुन्हा सुरू होण्याबाबत कार्यवाही होत नव्हती.

नागरिकांची गैरसोय व लुबाडणूक होत असल्याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते, तसेच खासदार नरेश म्हस्के यांनी समस्येची दखल घेऊन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला व बंद असलेले केंद्र तत्काळ सुरू करण्याची मागणी केली. त्यानंतर बुधवारी (ता. १०) हे केंद्र सुरू करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.