पेट्रोलपंप कामगारांची न्यायासाठी वणवण

पेट्रोलपंप कामगारांची न्यायासाठी वणवण

Published on

पेट्रोल पंप कामगारांची न्यायासाठी वणवण
- घाटकोपर दुर्घटना; पगार नाही, हाताला काम नाही
नीलेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
घाटकोपर, ता. ११ ः घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या दोन महिन्यांनंतरही येथील पेट्रोल पंपातील कामगारांची न्यायासाठी वणवण सुरू आहे. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या ६६ कामगारांना नुकसानभरपाई म्हणून छदामही मिळालेला नाही. काही दिवसांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांच्याकडे निवेदने देऊन पाठपुरावा करीत आहेत, अशी माहिती एका कामगाराने दिली.
मुंबईत झालेल्‍या अवकाळी पावसात १३ मे रोजी वादळी वाऱ्याने घाटकोपरच्या रेल्वे पोलिस वसाहतीतील पेट्रोल पंपावर बाजूचे महाकाय होर्डिंग कोसळले होते. त्यात १७ जण मृत्युमुखी पडले, तर ७५ जण जखमी झाले होते. याप्रकरणी आता तत्कालीन रेल्वे पोलिस आयुक्त खालिद कैसर यांना दोषी धरत निलंबित करण्यात आले आहे, मात्र दुसरीकडे या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. या दुर्घटनेत पेट्रोल पंपावर काम करणारा संजय यादव याचा बळी गेला होता. त्याला तीन महिन्यांचा मुलगा आहे. दुर्घटनेनंतर कामगारांना चालू एक महिन्याचा पगार देण्यात आला होता, मात्र त्यानंतर पेट्रोल पंप चालकाकडून त्यांचा पगार बंद झाला. अचानक आलेल्या या संकटामुळे सध्या हे कामगार सरकारदरबारी पाठपुरावा करत आहेत. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री पियूष गोयल यांना लेखी निवेदने देत न्याय द्यावा, असे साकडे घातले आहे, अशी माहिती येथील कामगार प्रमोद दुबे याने दिली.
पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांना दरमहा केवळ ११ हजार रुपये पगार होता, मात्र आता हा पेट्रोल पंप अनधिकृत आणि चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने कामगार बेरोजगार झाले आहेत. आम्हाला नुकसानभरपाई मिळावी, अशी कामगारांची मागणी आहे.


पेट्रोल पंप अनधिकृत
हा पेट्रोल पंप रेल्वे पोलिस कल्याण निधीसाठी २०२२ मध्ये तत्कालीन रेल्वे पोलिस आयुक्त खालिद कैसर यांनी पुढाकार घेत भाड्याने दिला होता. ही बाब लपून होती, मात्र ही दुर्घटना घडल्यानंतर निधीच्या नावाखाली आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचे उघड झाल्यानंतर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी कैसर यांना काही दिवसांपूर्वी निलंबित केले आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे लाखोंचा मलिदा कंपनीच्या खात्यावर जमा झल्याचे समोर आले, तर दुसरीकडे हा पेट्रोल पंप अनधिकृत असल्याने चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने खालिद कैसर यांच्यासह कामगारांच्याही अडचणी वाढल्या आहेत.

वर्षाची कमाई ५० कोटी
हा पेट्रोल पंप सुरू झाल्यापासून वार्षिक कमाई तब्बल ५० कोटी इतकी होती, असा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे इतकी कमाई असतानाही व्यवस्थापन आम्हाला नुकसानभरपाई का देत नाही, असा सवाल याबाबत बोलताना कामगारांनी केला आहे.

या दुर्घटनेशी आमचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे पेट्रोल पंप कायमचा बंद झाल्‍यास आमच्या उदरनिर्वाहाचे काय? आम्ही केलेल्‍या कामाचा मोबदला मिळायलाच हवा. त्यासाठी आम्ही राज्य सरकार ते केंद्र सरकारशी पाठपुरावा करत आहोत.
प्रमोद दुबे, पेट्रोल पंप कामगार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.