‘आव्हाड’ पवारांसोबत ‘पहाड’ बनून उभे राहिले

‘आव्हाड’ पवारांसोबत ‘पहाड’ बनून उभे राहिले

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : महाराष्ट्र ही शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांची भूमी आहे. या भूमीवर गद्दारी फार काळ टिकणार नाही. या वेळेस महाराष्ट्रात परिवर्तन होणारच आहे. हे परिवर्तन होत असताना पाच वर्षे मागे जाऊन पाहा. जेव्हा अंधारात अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा शरद पवार यांच्यासोबत डॉ. जितेंद्र आव्हाड हेच ‘पहाड’ बनून उभे राहिले होते, अशा शब्दांत काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी गौरवोद्गार काढले.
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारार्थ मुंब्य्राच्या एमएम व्हॅली येथे जाहीर सभा घेण्यात आली होती. त्या सभेत कन्हैया कुमार बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रांताध्यक्ष अजय राय हेदेखील उपस्थित होते. आपल्या भाषणात कुमार यांनी देशभरातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, येत्या २० तारखेला परिवर्तनासाठी मतदान करायचे आहे. मी काही एवढा मोठा नाही की तुम्हाला काही शिकवायला आलो. पण, धर्मनिरपेक्षतेच्या प्रत्येक लढाईत ठाम उभे राहणाऱ्या डॉ. आव्हाड यांना पाठबळ देण्याची भूमिका आपली असली पाहिजे. त्यासाठीच येथे आलो आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आव्हाड यांना मत देऊन सेक्युलर आवाज बुलंद केला पाहिजे. याप्रसंगी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी प्रथम क्रमांकाचे बटन दाबून आपणाला विजयी करावे, असे आवाहन केले. जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांसह हजारो नागरिक उपस्थित होते.

देशाची तिजोरी शेतकऱ्यांवर खर्च झाली पाहिजे
गेल्या पाच वर्षांत आठ लाख लोकांनी परदेशी नागरिकत्व घेतले आहे. एवढी भीती देशात निर्माण झाली आहे. या देशाची जमीन आपल्या रक्ताने, घामाने शिंपडणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या करावी लागत आहे. देशाची तिजोरी शेतकरी, कष्टकऱ्यांवरच खर्च झाली पाहिजे; भांडवलदारांवर नाही, असे सांगून कन्हैया कुमार यांनी तुम्ही आव्हाड यांना मत देणार नाही, तर तुमच्यासाठी लढणाऱ्याला सेक्युलर आवाजाला मत देणार आहात, हे विसरू नका. या ठिकाणी आव्हाड यांना एक लाखाचे मताधिक्य देऊन गद्दारांना उत्तर द्यावे, असे आवाहन केले.

बेईमानी उधळून लावा : अजय राय
हा देश गंगा-जमुना संस्कृती पाळणारा देश आहे. ज्या गंगेत हिंदू अभ्यंगस्नान करतात; त्याच गंगेत मुस्लिम वजू करतात. ही संस्कृती आपण तुटू देणार नाही. हे सरकार बेईमानीने जन्माला आले आहे. ते योजनेच्या माध्यमातून पैसे देऊन मते विकत घेतील. पण, ते पैसे त्यांचे नाहीत. आपलेच आहेत, हे लक्षात ठेवा. बेईमान सरकार उधळून लावा, असे आवाहन अजय राय यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com