दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुले बेपत्ता
दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुले बेपत्ता
भिवंडीत अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ
भिवंडी, ता. १६ (बातमीदार) : शहरात अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. शांतीनगर पोलिस ठाण्यात तीन मुलांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अल्पवयीन मुलांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, २०२४ मध्ये अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचे २२७ आणि २०२३ मध्ये १७२ अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचे गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे वाढत्या अपहरणाच्या घटनांमुळे पालकांची चिंता वाढली आहे.
शांतीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री नगर येथील रहिवासी सुशील कुमार अर्जुन प्रसाद निषाद (३५) यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात त्यांची पाच वर्षांची मुलगी दृष्टी निषाद हिचे अज्ञात व्यक्तीने तिच्या घरातून अपहरण केले आहे, अशी तक्रार दाखल केली आहे. त्याचप्रमाणे भिवंडी ग्रामीण भागातील विठ्ठल मंदिराजवळील सरोज अमरजीत जयस्वाल (३४) यांनी त्यांच्या अडीच वर्षांच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सरोज यांचा मुलगा आयांश अमरजीत जयस्वाल हा घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. त्या वेळी एका अज्ञात व्यक्तीने मुलाचे अपहरण केले आहे.
शांतीनगर परिसरातील एक ३५ वर्षीय महिलेची १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी बुधवारी (ता. १२) दुपारी चार वाजता कोणालाही न सांगता घराबाहेर पडली. या वेळी अज्ञात आरोपीने तिच्या अज्ञानाचा फायदा घेत तिला प्रलोभन दाखवून अपहरण केल्याची तक्रार केली आहे.
भिवंडी शहरात २०२४ मध्ये अपहरणाचे २२८ गुन्हे दाखल झाले. त्यामध्ये २२७ अल्पवयीन मुलांचा समावेश होता. यापैकी १६१ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत, तर इतरांचा शोध सुरू आहे.
२०२३ मध्ये शहरात अपहरणाचे १७२ गुन्हे दाखल झाले. त्यामध्ये १०० अल्पवयीन मुली आणि ६६ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यापैकी ६५ मुले आणि ८६ अल्पवयीन मुली सापडल्या आहेत, तर १४ मुली अजूनही बेपत्ता आहेत.
शहरात अपहरणाच्या घटना फारच कमी घडतात. एखादा मुलगा किंवा मुलगी चार तास घराबाहेर खेळण्यासाठी गेली असेल, तर कुटुंब काळजीत पडून पोलिस ठाण्यात गेले. तरीही पोलिस अपहरणाचा गुन्हा नोंदवतात. अनेकदा हरवलेले मूल घरी परत येते. याची खबर तक्रारदारांनी न दिल्यानेदेखील अपहरणाचा गुन्हा नोंदविलेला दिसतो. पोलिस परिमंडळ-२ मध्ये अपहरणाचा कोणताही गुन्हा घडला की लगेच पोलिस पथके तयार करून तपास सुरू करतात. काही वेळा बहुतेक अल्पवयीन मुले आणि मुली कोणाच्या तरी प्रेमात पळून जातात, असेही घडते; मात्र अशा घटनेकडे पोलिस सतर्क राहून लक्ष देतात.
मोहन दहिकर, पोलिस उपायुक्त, भिवंडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

