चौक जेटीचे काम रखडले

चौक जेटीचे काम रखडले

Published on

भाईंदर, ता. १९ (बातमीदार) : उत्तन परिसरातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या चौक बंदरातील चौक जेट्टीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या जेट्टीच्या पुनर्बांधणीसाठी मत्स्यव्यवसाय विभागाने पाच कोटी मंजूर केले आहेत. या कामासाठी किनारपट्टी नियमन क्षेत्र म्हणजेच सीआरझेडची परवानगी आवश्यक आहे, परंतु ही परवानगी देण्यासाठी सीआरझेड समितीची नियुक्तीच झाली नसल्याने जेट्टीचे काम रखडले आहे. त्यामुळे मच्छीमारांची मोठी गैरसोय होत आहे.

चौक बंदर हे नैसर्गिकरित्या सुरक्षित बंदर म्हणून ओळखले जाते. हे बंदर अरबी समुद्रापासून आतल्या बाजूला वसई खाडीत आहे. बाजूला डोंगर असल्याने वादळाचा थेट तडाखा बंदराला बसत नाही. म्हणूनच समुद्रात वादळ आल्यास उत्तनमधील बहुतांश मच्छीमार आपल्या नौका चौक बंदरात उभ्या करतात. त्याचप्रमणे नौकांची दुरुस्ती, रंगरंगोटीचे कामदेखील बंदरात चालते. या बंदरात असलेली जेट्टी सुमारे ४० ते ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहे. सध्या ती धोकादायक अवस्थेत असून, तिच्या पायऱ्यादेखील तुटल्या आहेत. जेट्टीची लांबी कमी असल्यामुळे मासेमारीसाठी जाताना लागणारे सामान जेट्टीवरून वाहनाद्वारे नौकेजवळ नेणे शक्य होत असते. तसेच ओहोटीच्या वेळी डिझेल, बर्फ व इतर सामान मच्छीमारांना खांद्यावर उचलून चिखलातून नौकांपर्यंत न्यावे लागते.

दुसरीकडे या बंदरात सुमारे २०० मासेमारी नौका असतात. परिणामी जेट्टीवरची वर्दळदेखील वाढली असल्यामुळे त्याची रुंदी कमी पडू लागली आहे, शिवाय अनेक ठिकाणी ती तुटायला आली असल्यामुळे धोकादायक बनली आहे, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे. जेट्टीची डागडुजी व्हावी व जेट्टीची लांबी किमान ५० मीटर वाढवून रुंदीदेखील वाढविण्यात यावी, अशी येथील मच्छीमारांची मागणी आहे, परंतु ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही.

सुमारे १५ वर्षांपूर्वी जेट्टीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते, परंतु या कामासाठी मंजूर झालेल्या निधीत त्याची डागडुजी होणे शक्य नसल्याने कोणीही कंत्राटदार ते काम करण्यास तयार झाला नाही. त्यामुळे दुरुस्तीचे काम लांबणीवर पडले. त्यानंतर आता मच्छीमारांच्या मागणीनुसार मत्स्यव्यवसाय विभागाने ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जेट्टीच्या कामासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षात पाच कोटी मंजूर केले.

काम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व चाचण्या घेऊन त्याचा परिपूर्ण अहवाल कोकण विभागीय पत्तन अभियंत्यांनी तयार केला व कामासाठी निविदा प्रक्रियादेखील सुरू केली, परंतु काम सुरू करण्याआधी सीआरझेडची मान्यता आवश्यक असल्याने या समितीसमोर जेट्टीच्या कामाचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे, परंतु याआधीच्या समितीची मुदत संपुष्टात आली आहे. नवी समिती अद्याप स्थापित झालेली नाही. त्यामुळे या समितीची मान्यता मिळेपर्यंत सीआरझेड परवानगी मिळणार नाही व जेट्टीच्या कामाला सुरुवात होऊ शकणार नाही. त्याचा फटका स्थानिक मच्छीमारांना बसत आहे.

समिती स्थापन होणार
जेट्टीच्या कामाचा प्रस्ताव सीआरझेड समितीपुढे पाठविण्यात आला आहे. समितीचे गठन लवकरच होणार आहे. त्यानंतर प्रस्तावाला मान्यता घेऊन जेट्टीचे काम लवकरात लवकर सुरू केले जाईल, अशी माहिती उत्तन येथे नुकत्याच झालेल्या लोकदरबारात कोकण विभागीय पत्तन अभियंत्यांनी दिली.

मच्छीमारांनी जेट्टीसाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर जेट्टीसाठी निधी मंजूर झाला, परंतु सीआरझेड समितीची मान्यता मिळत नसल्याने जेट्टीचे काम सुरू होऊ शकलेले नाही. परिणामी मच्छीमारांची मोठी गैरसोय होत आहे.
- जॉर्जी गोविंद, मच्छीमारांचे नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com