कर्जतमध्ये पाणी टंचाईचे सावट

कर्जतमध्ये पाणी टंचाईचे सावट

Published on

कर्जतमध्ये पाणीटंचाईचे सावट
महिलांचा पंचायत समितीवर हंडा मोर्चा; प्रभावी जलजीवन योजना राबविण्याची मागणी
कर्जत, ता. ४ (बातमीदार) ः कर्जत तालुक्यातील किरवली गावातील तीव्र पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संतप्त महिलांनी पंचायत समितीवर मंगळवारी हंडा मोर्चा काढला. यापूर्वीही पाणीटंचाईबाबत पंचायत समितीकडे तक्रार करण्यात आली होती, मात्र कोणताही ठोस निर्णय न झाल्याने महिलांनी शेकडोंच्या संख्येने एकत्र येत आंदोलन उभारले. या वेळी संतप्त महिलांनी अधिकारीवर्गाला चांगलेच धारेवर धरले होते, तर कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
किरवली गावासाठी २०२१ मध्ये जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे ४० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली आहे. हा निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत रेल्वे पट्ट्यातील सात ग्रामपंचायतींसाठी मंजूर झाला होता, मात्र किरवली व हालीवली गावांमध्ये जागेअभावी या योजनेची अंमलबजावणीच झाली नाही. तालुक्यातील काही गावांमध्ये जलजीवन मिशनच्या कामांना सुरुवात झाली असली, तरी किरवलीतील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे येथील पाणीपुरवठा योजना सुरू होऊ शकली नाही. आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रयत्न केले असते, तर हा प्रश्न सुटला असता, असा आरोप येथील नागरिकांकडून जात आहे. गावातील बऱ्याच कुटुंबांकडे खासगी बोअरवेल आहेत, मात्र जमिनीतील पाण्याची पातळी खालावत असल्याने या बोअरवेलही कोरड्या पडल्या आहेत. याच भागात रेल्वे बोगद्याच्या ब्लास्टिंगमुळेसुद्धा संबंधित पाण्याचे स्रोत नष्ट झाले असावेत, असा कयास लावण्यात येत आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पंचायत समितीने तात्पुरता उपाय म्हणून दोन बोअरवेल बसवण्याची तयारी दर्शवली असून, जागा उपलब्ध होताच बोअरवेल खोदण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले, मात्र महिलांनी हा उपाय तात्पुरता असून, कायमस्वरूपी तोडगा हवा, अशी मागणी केली आहे. या वेळी महिलांनी तहसीलदारांना निवेदन देत पाणीपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तसेच येत्‍या १५ दिवसांत तोडगा निघाला नाही, तर तीव्र जनआंदोलन व उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
.....................
चौकट
कागदपत्रांअभावी खोळंबली योजना
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने किरवली आणि हालीवलीसाठी नळपाणी पुरवठा योजना राबविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे, मात्र ग्रामपंचायतींकडून आवश्यक कागदपत्रे आणि ठराव मिळाले नसल्याने पुढील कार्यवाही रखडली आहे. हा प्रस्ताव सुमारे पाच कोटींच्या वर असल्याने योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता समितीच्या २४ फेब्रुवारीच्या बैठकीत प्रस्ताव शासनास सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जलजीवन मिशन आणि नळपाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय प्रक्रियेत होत असलेल्या विलंबामुळे ग्रामस्थांचे हाल सुरूच आहेत.
...............................
प्रतिक्रिया
किरवली गावाच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे जलजीवन मिशन योजना राबवण्यात येणार आहे. पाणीपुरवठ्यासाठी पाली-भूतिवली धरणातून पाणी उचलण्याची योजना आहे. २०२१ मध्ये या योजनेस मंजुरी मिळाली असली, तरी साठवण टाकीसाठी जागा उपलब्ध न झाल्याने तिची अंमलबजावणी रखडली आहे. एनजेएस या संस्थेकडे या योजनेच्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, मात्र काही कारणांमुळे काम ठप्प झाले होते. आता पुन्हा त्यांना आदेश देण्यात आले असून, लवकरच प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, मात्र यासाठी साठवण टाकीसाठी जागा मिळणे आवश्यक आहे.
.................
स्थानिक लोकप्रतिनिधींनी सहकार्य केल्यास जलजीवन मिशन योजनेची अंमलबजावणी जलदगतीने होईल आणि गावातील नागरिकांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा मिळू शकेल.
- अनिल मेटकरी, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा राजिप
#######

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com