धारावी कुंभारवाड्यात मातीच्या भांड्यांना मागणी

धारावी कुंभारवाड्यात मातीच्या भांड्यांना मागणी

Published on

धारावी कुंभारवाड्यात मातीच्या भांड्यांना मागणी
उष्‍णता वाढल्‍याने थंडगार पाण्याकडे ओढा
संजय शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
धारावी, ता. ७ (बातमीदार) : मुंबईमध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. तापमानातील वाढीमुळे जीवाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे सर्वांचाच ओढा गार पाणी पिण्याकडे वाढला आहे. विशेषकरून माठातील पाणी अधिक गुणकारी समजले जात असल्याने माठांना मागणी वाढल्याचे चित्र धारावी येथील कुंभारवाड्यात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मातीच्या इतर भांड्यांनाही मागणी वाढली आहे.
धारावीत मातीचे साहित्‍य बनवणारी जवळपास एक हजार ५०० कुटुंबे वास्तव्य करून आहेत. आधी विविध कारणांनी त्‍यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असताना लॉकडाऊनमुळे त्यात भर पडली होती. मातीपासून विविध वस्तू बनविणे व त्याची विक्री करण्याचे काम करणाऱ्या जवळपास ५०० कुटुंबांचे काम निम्म्यावर आले होते; मात्र आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येत आहे. गोविंद चित्रोडा येथील एक रहिवासी असून, त्यांची चौथी पिढी मातीचे साहित्य बनवून ते विक्री करून त्यावर आपला उदरनिर्वाह चालवत आहे. कोरोनानंतर आरोग्याची काळजी वाढल्याने अनेक जण माठातील पाणी पिण्यास प्राधान्य देत असल्याचे येथील विक्रेते सांगतात.

आधुनिकतेची कास
धारावीतील कुंभारवाडा आधुनिकतेची कास धरत आहे. अनेक कुटुंबांनी परंपरागत पद्धतीने मातीचे साहित्य बनवण्यासोबतच यंत्राच्या सहाय्याने मातीचे साहित्य बनवणे सुरू केले आहे. यात तरुण पिढीने पुढाकार घेतला आहे. परंपरागत पद्धतीचे काम वेळखाऊ व मेहनतीचे होते. नवीन यंत्रामुळे वेळ वाचत आहे; तर मेहनतही कमी झाली आहे. कमी वेळेत जास्त काम होत असल्यामुळे कमाई वाढण्यास मदत होत आहे.

यंत्राच्या १०० भट्ट्या
कुंभारवाड्यातील काही कुटुंबांकडे मातीचे साहित्य बनवणारे यंत्र आहे. एका भट्टीत एकावेळेस जवळपास १५० माठ बनतात. अशा धारावीतील कुंभारवाड्यात १०० भट्ट्या आहेत.

विविध आकारांचे, आकर्षक माठ
कुंभारवाड्यात सध्या विविध आकारातील, आकर्षक डिझाइनमधील माठ विक्रीस ठेवण्यात आले आहेत. मुंबई, पालघर व ठाणे जिल्हा येथे धारावीत बनलेल्या माठांना अधिक मागणी आहे. लाल, काळे व पांढऱ्या रंगात माठ बनवले जातात. दोन लिटर ते १५ लिटरपर्यंतच्या माठांना सार्वधिक मागणी असल्याचे गोविंद चित्रोडा यांनी सांगितले.

किमतीत २० टक्के वाढ
माती व कामगारांच्या खर्चात वाढ झाल्याने माठाच्या किमतीही वाढल्या आहेत. सध्या कुंभारवाड्यात २५० ते ६०० रुपयांपर्यंत माठाची किंमत आहे. मार्च ते जूनपर्यंत माठांना मोठी मागणी असते.

माठाचे फायदे
माठातले पाणी प्यायलाने टॉन्सिल्स, सर्दी यांसारख्या समस्या होण्याची शक्यता कमी होते. उष्माघातापासून संरक्षण, शरीराला अनेक खनिजे, जीवनसत्वे मिळतात.
पोटाची उष्णता नैसर्गिक पद्धतीने थंड होते. रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते. खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com