पाणीटंचाई निवारणासाठी २२ लाखांची तरतूद

पाणीटंचाई निवारणासाठी २२ लाखांची तरतूद
Published on

खालापूर, ता. १० (बातमीदार)ः बारमाही वाहणारी नदी असली तरी फेब्रुवारी संपताच खालापूर तालुक्यातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात. या समस्‍येवर तोडगा काढण्यासाठी तालुका पंचायत समिती कार्यालयाकडून २२ लाख २५ हजारांचा संभाव्य टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला असून, जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
तालुक्यातील टंचाईग्रस्त संभाव्य गावे आणि वाड्यांची यादी तयार करण्यात आली आहे. सुमारे १३ गावे आणि २८ वाड्यांचा यात समावेश आहे. २०२४-२५ मध्ये तहान भागवण्यासाठी २२ लाख २५ हजार रुपये निधीची तरतूद केली आहे. खालापूर तालुका टंचाईग्रस्त यादीत असून, पावसाळ्याचे चार महिने संपल्यानंतर काही भागात तीव्र पाणीटंचाई जाणवते. यंदाच्या टंचाई निवारण कृती आराखड्यात नवीन विंधन विहीर दुरुस्ती, टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, सार्वजनिक विहीर खोल व गाळ काढणे इत्यादी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
खालापूरचा दरवर्षी टंचाईग्रस्‍त तालुक्‍यात समावेश असतो. यंदा करण्यात आलेल्‍या उपाययोजनांमध्ये सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे यामध्ये वयाळ, कोपरी, आंबेमाळवाडी, टेंभरीवाडी या गावांसाठी तीन लाखांचा निधी आवश्‍यक आहे. टॅंकरने ज्‍या गावांत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, त्‍यात वावोशी, चिलठण, खानाव, बीड खुर्द, नारंगी, जांबरुंग, खरवई, तळवली, गोरठण, केळवली, गोळेवाडी, रानसई आदिवासी वाडी, ढेबेवाडी, बर्गेवाडी, बीड खुर्द आदिवासी वाडी, बीड खुर्द बौद्ध वाडी, उंबरवीरा ठाकूरवाडी, केळवली वाडी, परखंदे खालची वाडी, परखंदे धनगरवाडी, खैराट धनगरवाडा, वडविहीर कातकरवाडी, वावर्ले ठाकूरवाडी, पाली नरसरी, तीनघर ठाकूरवाडी, नारंगी दत्तवाडी, जांबरुंग बौद्धवाडी, माणिक नगर तळवली, टेंभरीवाडी, सारंग वाडी, कोपरी आंबेमाळवाडी, करंबेळी ठाकूरवाडी, खडईवाडी आदींचा समावेश असून १८ लाख ५० हजारांचा निधी अपेक्षित आहे. सारंगवाडी ग्रामपंचायतीतील टेंभरी येथे विंधण विहीर दुरुस्तीसाठी ७५ हजार रुपयांचा निधी अपेक्षित आहे. या निधीची मागणी करण्यात आली आहे.

टंचाईग्रस्त आराखडा मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर नव्याने गावे किंवा वाड्या समाविष्ट करण्यात अडचण येते. त्यासाठी प्रस्ताव करताना अगोदरच तरतूद करण्यात आली आहे. अद्याप कोणत्याही ग्रामपंचायतीकडून टॅंकरची मागणी करण्यात आलेली नाही.
- लहू ढोले, पाणीपुरवठा विभाग, खालापूर पंचायत समिती

..................

तोंडसुरे गावात पाण्यासाठी हंडा मोर्चा
भीषण पाणीटंचाईमुळे ग्रामस्‍थ आक्रमक; उपोषणाचा इशारा

म्हसळा, ता. १० (बातमीदार)ः रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची झळ लागण्यास सुरुवात झाली आहे. म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे गावातील पाण्याने आताच विहिरीचा तळ गाठला असून, नद्या कोरड्या पडल्या आहेत. तोंडसुरे गावासाठी मंजूर करण्यात आलेली तब्‍बल १३ कोटी पाच लाखांची नळ पाणीपुरवठा योजना बारगळल्याने चार ग्रामपंचायतींमधील नऊ वाड्यांना टंचाईचा फटका बसतो आहे.
पाभरे धरणातून शहराला पाणीपुरवठा होतो, मात्र सध्या टंचाईची झळा बसू लागल्‍याने हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भरउन्हात एक किलोमीटरची पायपीट करावी लागते. सोमवारी तोंडसुरे ग्रामपंचायत क्षेत्रातील तीन वाड्यांमधील एक हजाराहून अधिक ग्रामस्‍थांनी तीन किलोमीटर चालत पाणीपुरवठा कार्यालयांवर सरकारविरोधात घोषणाबाजी करीत हंडा मोर्चा काढला. पाणीपुरवठा कार्यालयातील अभियंत्‍यांना निवेदन दिल तसेच दोन दिवसांत टँकरने पाणीपुरवठा सुरू केला नाही, तर बेमुदत उपोषण करणार असल्याचे सांगण्यात आले. उपअभियंता जे. यु. फुलपगारे यांच्या लेखी आश्वासनानंतर मोर्चा विसर्जित करण्यात आला. याप्रसंगी तोंडसुरे नळ पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष महादेव पाटील, तालुका अध्यक्ष समीर बनकर, नगराध्यक्ष संजय कर्णिक, सरपंच सुरेश महाडिक, तीन वाडी अध्यक्ष वामन नाक्ती, सचिव सुदर्शन जंगम, सदस्य प्रकाश लोणशिकर आदी उपस्थित होते.

म्हसळा ः तालुक्यातील तोंडसुरे, जंगम वाडी, बौद्धवाडी परिसरातील सुमारे नऊ वाड्यांमधील ग्रामस्थांनी पाणीपुरवठा कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com