होळीआधी ठाण्यात कचरा पेटला

होळीआधी ठाण्यात कचरा पेटला

Published on

होळीआधी ठाण्यात कचरा पेटला
शहरांतील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, त. १० : ठाणेकरांच्या कचऱ्याचे संकलन करता करता मिनी डम्पिंग ग्राउंड बनलेल्या सी. पी. तलाव परिसरात आगीचे सत्र सुरूच आहे. गेल्या तीन दिवसांत येथील कचऱ्याला दोन वेळा आग लागली आहे. त्यामुळे धूर आणि दुर्गंंधीने ठाणेकरांना श्वास घेणे कठीण झाले आहे. दुसरीकडे कचरा टाकण्यासाठी कुठे जागाच सापडत नसल्याने पालिकेने दोन दिवसांपासून कचरा उचलण्यास बंद केले आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठा, सोसायट्यांचे आवार आणि अंतर्गत रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. त्यातूनही दुर्गंधी पसरत असल्याने शहरवासीयांमध्ये प्रचंड नाराजी वाढत चालली आहे. होळीआधीच ठाण्यात कचराप्रश्न पेटणार असल्याचे लक्षात येताच पालिका प्रशासनाने चोवीस तासांत हा कचरा उचलण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.

ठाणे शहरात दर दिवशी एक हजारहून अधिक टन कचरा जमा होतो. या कचऱ्याचे संकलन वागळे येथील सी. पी. तलाव परिसरात केले जाते. त्यानंतर त्याची रवानगी कचरा विल्हेवाट प्रकल्प केंद्रात करण्याचे मुख्य नियोजन होते, पण डायघर आणि गायमुख येथील कचरा प्रकल्प त्यासाठी तोकडे पडत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या भिवंडीतील आतकोलीच्या ३५ एकर भूखंडावर नवीन कचरा प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू झाली आहे, पण या प्रकल्पामागे लागलेल्या अडचणी वाढतच आहेत. आता हा प्रकल्प निविदा प्रक्रियेमुळे वादात आहे. हा वाद वाढत असताना दोन दिवसांपूर्वी सी. पी. तलाव परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली. मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आणि दुर्गंधीने संपूर्ण परिसरला त्रास सहन करावा लागला.

सी. पी. तलावाचा पर्याय बंद झाल्यामुळे कचरा टाकायचा कुठे, हा प्रश्न पालिकेसमोर उभा राहिला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जमा होणारा कचरा शहरात तसाच पडून आहे. विशेषतः ठाण्याची बाजारपेठ असलेल्या जांभळी येथे तसेच जवाहर बाग, खारकर आळी भागात मोठ्या प्रमाणात कचरा साठून ठेवला जात आहे. काही ठिकाणी कचऱ्याचा डोंगर उभा राहिला आहे, तर अनेक रस्ते कचऱ्याने व्यापून गेले आहेत. त्यामुळे सी. पी.नंतर खारकळ आळी ठाण्याचे मिनी डम्पिंग होण्याच्या मार्गावर आहे. यावरून येथील रहिवाशांमध्येही संताप व्यक्त होत आहे. यावर आज पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी अधिकाऱ्यांना तंबी देत चोवीस तासांत शहरातील कचरा उचलून थेट आतकोली येथे टाकण्याचे आदेश दिले आहेत.

आगीमागे षड्यंत्राचा धूर
वागळे इस्टेट येथील सी. पी. तलाव परिसरात तयार झालेले डम्पिंग हटवण्याची मागणी जुनी आहे. येथील रहिवाशांनीही वेळोवेळी आंदोलने केली होती. लोकसभा, विधानसभा निवडणुकीला त्याचा फारसा फटका बसला नाही, पण महापालिका निवडणुकीत स्थानिक मुद्दा म्हणून सी. पी. तलाव पेट घेणार, हे राजकारण्यांना माहीत आहे. आतकोलीचा प्रकल्प लांबत असतानाच सी. पी. तलाव परिसरातील कचऱ्याला ‘ठिणगी’ कशी लागली, असा संशयही विरोधी पक्षांकडून व्यक्त होत आहे.

होळीआधी ठाणे घेणार मोकळा श्वास
डायघर प्रकल्प २०० मेट्रिक टनचा आहे. कळवा आणि मुंब्रा येथील कचऱ्याचे वर्गीकरण करून सध्या या ठिकाणी त्याची विल्हेवाट लागत आहे, तर शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा तातडीने गायमुख येथील १०० मेट्रिक टन क्षमता असलेल्या प्रकल्पाकडे रवाना करण्याचे आदेश दिले आहेत, तर उर्वरित सुका कचरा आतकोली येथील क्षेपणभूमीवर हलवण्याचे आदेश दिले आहेत. चोवीस तासांत हा कचरा उचलण्याचे आदेश देण्यात आले असल्याने होळीआधी ठाणेकर मोकळा श्वास घेतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com