चार उड्डाणपूल तरीही कोंडी

चार उड्डाणपूल तरीही कोंडी
Published on

चार उड्डाणपूल... तरीही कोंडी!
वसई, विरार शहरात वाहनधारकांसह नागरिक बेजार
वसई, ता. २५ (बातमीदार) : वसई, विरार शहरात कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट बनली आहे, त्यामुळे वाहतूक व्यवस्थेला कुणी वाली आहे का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होऊ लागला आहे. शहरातील कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी चार उड्डाणपूल आहेत; मात्र तरीदेखील अद्याप कोंडी फुटलेली नाही. त्यामुळे प्रवाशांची वाट बिकट होत आहे. लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाने पर्यायी मार्गाच्या आश्वासनाचा मुलामा लावला असला तरी अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे नागरिक बेजार झाले आहेत.

वसई, विरार शहरात व बाहेरून येणारी हजारो वाहने रोज मार्गावरून धावतात, त्यामुळे महापालिकेने वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सिग्नल यंत्रणादेखील कार्यान्वित केली; मात्र अनेकदा यात बिघाड होतात. परिणामी, कोंडीत भर पडते. तसेच पार्किंगची व्यवस्था नसल्याने नोकरदार वर्ग वाहने रस्त्याच्या कडेला लावून कामानिमित्त निघतात. बेवारस वाहनांमुळेही वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मुख्य मार्गावर धावणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून नालासोपारा, विरार दोन तर वसई व नायगाव येथे प्रत्येकी दोन पूल उभारण्यात आले आहेत; मात्र पुलावरून ये-जा करताना खालचे रस्ते अरुंद आहेत, यामुळे कोंडीला सामोरे जावे लागत असते. पुलाखालील रस्त्यांचे विस्तारीकरण व्हावे, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.

वसई पूर्वेला मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे मालवाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. या वेळी प्रचंड कोंडी होते. सागरी मार्ग, उड्डाणपूल आणि रस्ते मार्ग विकसित होणार, अशी आश्वासने दिली जात आहेत; मात्र सद्यस्थितीत वसई, विरार शहर कोंडीमुक्त होण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत सुजाण नागरिकांतून व्यक्त केले जात आहे.

खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय मंत्र्याची भेट घेत ओसवाल आणि अलंकापुरी येथे रेल्वे उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी केली आहे. वसई पश्चिम माणिकपूर भागातील रस्ता अरुंद असल्याने याठिकाणी उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी राज्य सरकारच्या दरबारी केली आहे. कोंडीची समस्या सुटावी, यासाठी हा प्रयत्न असला तरी याबाबत कार्यवाही कधी होणार, असा सवाल निर्माण होत आहे. वाहतूक सुधारणा करण्यासाठी नियोजन, आराखडा आणि त्याची अंमलबजावणी तसेच नवे उड्डाणपूल मार्ग कार्यान्वित करण्याची गरज शहरात निर्माण झाली आहे; अन्यथा वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत राहिल्यावर कोंडीचा विळखा हा शहराला घट्ट होणार आहे.

अत्यावश्यक सेवांना फटका
इस्पितळात रुग्णांची ने-आण करण्यासाठी मार्गावरून रुग्णवाहिका धावत असतात; परंतु अनेकदा कोंडी निर्माण होत असते. त्यामुळे या वेळी वाहनांना जाणेदेखील मुश्किल होत असते. अग्निशमन दलाच्या वाहनांनादेखील कोंडीतून वाट काढताना कसरत करावी लागते.

वाहनांच्या रांगा लागल्यावर कामानिमित्त ये-जा करण्यासाठी वेळ खर्च होतो. परिणामी, वेळेवर पोहोचता येत नाही. महापालिकेने याबाबत लक्ष घालून पर्यायी मार्ग, रिंग रूट सेवेसाठी उपाययोजना कराव्यात, जेणेकरून वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील.
- रवी आयरे, नागरिक

वसई : वसई, विरार शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com