

वाहतूक कोंडीवरून टोलवाटोलवी
कल्याण-शिळ रोडवर विजेचे खांब हटवण्याची एमएमआरडीएची जबाबदारी; महावितरणचे स्पष्टीकरण
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० : कल्याण-शिळ रोडवर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी होण्याची अनेक कारणे आहेत. मार्गात येणाऱ्या विजेच्या खांबांमुळे कोंडी होते, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली होती. यावर महावितरणने आपली बाजू मांडताना कल्याण-काटई नाका मार्गावरील विद्युत खांब हटविण्याची जबाबदारी एमएमआरडीएची आहे. महावितरण यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले आहे.
कल्याण-शिळ रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होत असून याचा फटका चाकरमानी, शाळेच्या बस, रुग्णवाहिकांना बसत आहे. या मार्गावर कोंडी होण्यासाठी मेट्रोचे सुरू असलेले काम, मार्गाचे रखडलेले रुंदीकरण, रस्त्यात येणारे विजेचे खांब अशी अनेक कारणे असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली होती. याबाबत महावितरणने याप्रकरणी प्रसिद्धिपत्रक काढत आपली बाजू मांडली आहे. महावितरणने म्हटले आहे, की कल्याण ते शिळफाटा मार्गावरील काटई नाक्यापर्यंतच्या सुमारे १० किलोमीटरदरम्यान मेट्रो आणि आनुषंगिक कामांमुळे वाहतुकीला अडथळा ठरणारे विजेचे खांब व वाहिन्या स्थलांतरित करण्याची जबाबदारी एमएमआरडीएची आहे. हे काम करताना विजेचे खांब स्थलांतरित करण्यासाठी एमएमआरडीएने दिलेला प्रस्ताव १.३ टक्के डीडीएफ योजनेतून मंजूर करून महावितरणने एप्रिल २०२४ मध्येच एमएमआरडीएला दिला आहे. त्यानुसार एमएमआरडीएने कंत्राटदाराची नियुक्ती करणे आवश्यक होते. यासंदर्भात महावितरणने सातत्याने पाठपुरावा केल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
कल्याण-शिळफाटा मार्गावर कटाई नाक्यादरम्यान मेट्रो व आनुषंगिक कामे करताना विजेचे खांब व वाहिन्या स्थलांतरित करण्याबाबत एमएमआरडीएने प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला महावितरणने एप्रिल २०२४ मध्ये १.३ टक्के डीडीएफ योजनेतून मंजुरी दिली. त्यानुसार रुंदीकरण करताना विजेचे खांब स्थलांतरित करण्याची जबाबदारी एमएमआरडीएच्या विद्युत विभागाची आहे. महावितरणची जबाबदारी केवळ संबंधित कामावर देखरेख ठेवण्यापर्यंत मर्यादित आहे.
सातत्याने पाठपुरावा
कामाच्या अंदाजपत्रकाला महावितरणकडून मे २०२४ मध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून एमएमआरडीएकडून कंत्राटदाराची निवड करणे, तसेच त्याच्याकडून विजेचे खांब व वाहिन्या रस्त्याच्या बाजूला स्थलांतरित करण्याची कार्यवाही होणे अपेक्षित होते. सातत्याने पाठपुरावा करूनही एमएमआरडीएने कंत्राटदाराची नियुक्ती केलेली नाही. तसेच देखरेख शुल्काचा भरणाही महावितरणकडे केलेला नाही. वाहतुकीला अडथळा ठरणारे खांब व वाहिन्या स्थलांतरित करण्याच्या कामाची जबाबदारी एमएमआरडीएची आहे. हे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी महावितरण सातत्याने पाठपुरावा करीत असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.