क्रांतीसुर्याच्या आठवणींना कसाऱ्यात उजाळा

क्रांतीसुर्याच्या आठवणींना कसाऱ्यात उजाळा

Published on

भरत उबाळे ः सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. १३ : तालुक्याला विविध ऐतिहासिक संदर्भ लाभलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत विचारांचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३३ मध्ये कसारा येथे सभा घेतली होती. या ऐतिहासिक सभेला प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या कसारा गावातील मिलिंदनगर येथील रखमाबाई पंडित वयाच्या १०१ वर्षीही त्याच आठवणी आजही डोळ्यात साठवून आहेत.
रखमाबाई यांचा जन्म १९२४ चा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कसाऱ्यात घेतलेल्या १८ फेब्रुवारी १९३३ च्या सभेवेळी ९ ते १० वर्षांच्या होत्या. कोंडाजी नामदेव पंडित यांच्या घरासमोरच्या अंगणातच ही सभा झाली होती. पंडित यांच्याच घरी बाबासाहेबांचे रात्रीचे जेवण झाले होते. त्याकाळी बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण ऐकलेल्यांपैकी रखमाबाई आजही त्या आठवणींनी गहिवरतात. बाबासाहेब कसाऱ्यात आले. त्यांच्यासोबत असलेले पोलिस, बाबासाहेब कसे दिसतात, कसे खणखणीत बोलतात, याबाबतच्या आठवणी त्यांच्याकडून ऐकायला मिळतात. डॉ. बाबासाहेबांच्या कसाऱ्यातील त्या भाषणाने पुढे इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदल्या गेलेल्या विविध आंदोलनांना जन्म दिला होता. त्यामुळे कसाऱ्यातील ती सभा अजरामर ठरली होती.
--------------------------------------------------------
मोटारीतून मिरवणूक
कसाऱ्यातील परिषदेच्या निमित्ताने अध्यक्षस्थान भूषवणारे डॉ. बाबासाहेब मुंबईहून मोटारीने रात्री ८ वाजता कसारा मुक्कामी पोहोचले. त्यांच्यासोबत शिवतरकर, दिवाकर पगारे व गणपतराव ऊर्फ मडकेबुवा आले होते. नाशिकहून मेसर्स भाऊराव गायकवाड, के. बी. जाधव, लिंबाजीराव भालेराव व रामचंद्र रोकडे उपस्थित होते. समता सैनिक दलाचे कल्याण येथून आलेले स्वयंसेवक आणि आसपासच्या खेड्यापाड्याहून आलेल्या प्रतिनिधींनी बाबासाहेबांची मोटारीतून मोठी मिरवणूक काढून त्यांना सभास्थळापर्यंत नेले होते.
---------------------------------------------------
नवीन राज्यघटनेचा नारा
देशात ‘खालच्याने दळावे व वरच्याने’ भाकरी खावी, अशी परिस्थिती आहे. इंग्रजी राज्य आले तरी त्यांनी क्रांती घडवून आणली नाही. स्थिती बदललेली नाही, कारण ते परके लोक आहेत. त्यांना आपला राज्यकारभार चालवण्याकरिता उच्चवर्णीयांची मदत घ्यावी लागते. म्हणून त्यांच्या अनुमतीने राज्यकारभार चालवला जातो. म्हणूनच परिस्थिती काही बदललेली नाही, पण यापुढे नवीन राज्यघटनेत आपलीही सत्ता चालेल. वरचा आणि खालचा, असा भेद राहणार नाही, असा नारा कसाऱ्यातील सभेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com