मिरा- भाईंदरमध्ये भाजप- शिवसेनेमधील वाद टोकाला
मिरा-भाईंदरमध्ये भाजप-शिवसेनेमधील वाद टोकाला
पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार
भाईंदर, ता. २७ (बातमीदार) : मिरा-भाईंदरमध्ये भाजप व शिवसेना शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी शिंदेच्या शिवसेनेतील एका बड्या नेत्याच्या विरोधात थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजू भोईर यांनीदेखील भाजपच्या एका नेत्याविरोधात उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. आगामी महापालिका निवडणुकांपर्यंत हा वाद आणखी चिघळत जाणार असल्याचे संकेत यानिमित्ताने मिळत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मिरा-भाईंदरमध्ये स्थानिक राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. भाजप व शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाची ताकद वाढविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातूनच दोघांमध्ये वाद वाढू लागले आहेत. याच वादातून भाजपने शिवसेनेच्या बड्या नेत्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सदरील नेता हा स्वार्थाचे राजकारण करत असून, स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी व स्वत:चा व्यवसाय वाढविण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिका व राज्य सरकारचे आर्थिक नुकसान करत आहेत. त्यामुळे महायुती सरकारची बदनामी होत आहे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
संबंधित नेत्याने चेणा परिसरात जमिनी खरेदी करून त्याचा विकास करण्यासाठी सरकार व महापालिकेचे दीडशे कोटी रुपये खर्च करून रस्ते व नाले बांधले आहेत, रस्त्याच्या जागा महापालिकेने ताब्यात घ्याव्यात यासाठी २९ कोटी रुपये जमीन मालकांना देण्यास महापालिकेला भाग पडले. जे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे, असे जैन यांच्या आरोपात नमूद केले आहे. याव्यतिरिक्त जमिनींचा विकास करण्यासाठी शेकडो झाडांची कत्तल करणे, इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये परवानगी न घेता बांधकाम करणे, स्वत:च्या बांधकामांना चांगला भाव मिळावा यासाठी राज्य सरकारच्या ७० कोटी निधीतून रिव्हर फ्रंट उभारणे आदी आरोप जैन यांनी शिंदे सेनेतील बड्या नेत्यावर केले आहेत. यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असून, त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती भाजपचे जिल्हाध्यक्ष जैन यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
............
काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे राजू भोईर यांनीदेखील भाजपच्या एका बड्या नेत्याच्या विरोधात उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. यात शिवसेनेकडून ठेवण्यात येत असलेल्या कंटेनर शाखांवर कारवाई करण्यासाठी संबंधित नेता महापालिका आयुक्तांना धमकावत आहेत, पालिकेला जागा हस्तांतर करण्याच्या नावाखाली त्यांच्या कंपनीकडून टीडीआर लाटण्यात आले आहेत, तसेच शहरात ठिकठिकाणी फेरीवाल्यांना बसवून त्यांच्याकडून वसुली केली जात आहे, असे आरोप भोईर यांनी केले होते. या दोघांमध्ये सुरू झालेल्या पत्रयुद्धाची मिरा-भाईंदरमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. महापालिकेची निवडणूक जवळ येईल तसा हा वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.