पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

Published on

पावसात वीज यंत्रणेपासून सतर्कतेचे महावितरणचे आवाहन
कल्याण परिमंडल चोवीस तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित
विरार, ता. ३ (बातमीदार)ः मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्किट आदींमुळे अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सतर्क राहावे, असे आवाहन महावितरणने नागरिकांना केले आहे.
पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थितीत धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. तर, कल्याण परिमंडला अंतर्गत सर्वच कार्यालयांमध्ये चोवीस तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत साधनसामग्री व मनुष्यबळासह सज्ज राहण्याचे निर्देश मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी दिले आहेत.

पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळ्यात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. मुसळधार पाऊस व जोराचा वारा यामुळे झाडे व फांद्या वीजतारांवर पडतात आणि वीजखांब वाकतात, वीजतारा तुटतात किंवा लोंबकळत राहतात. अशा तारांमध्ये वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने, त्यापासून सावध राहावे. या वीजतारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. असे प्रकार आढळल्यास तातडीने महावितरणशी संपर्क साधावा.

काय काळजी घ्यावी?
- विजेवर चालणारी सर्व उपकरणे नेहमी स्वीचबोर्डपासून बंद करावीत.
- विशेषतः ग्रामीण भागात विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत.
- विजेचे खांब किंवा तारांजवळ कपडे वाळत घालू नयेत.
- घरातील विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
- वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी.
- विजेची तार म्हणून तांब्याऐवजी ॲल्युमिनियम मिश्रधातू या विशिष्ट धातूची तार वापरावी.

टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध
महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. यासह मोबाईल ॲप, वेबसाईटद्वारेही तक्रारी स्वीकारल्या जातात. वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाईलवरून ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस कॉल दिल्यास किंवा संदेश ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाईल. वसई मंडलासाठी ७८७५७६०६०२, पालघर मंडलासाठी ९०२८१५४२७८ हे नियंत्रण कक्षाचे क्रमांक ग्राहकांच्या तक्रारी व धोक्यांची सूचना देण्यासाठी उपलब्ध आहेत, असे मंडलाकडून जाहीर करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com