शिवराज्याभिषेकदिन सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन
अलिबाग, ता. ३ (वार्ताहर) ः शिवराज्याभिषेक सोहळ्याचे दुर्गराज रायगड येथे तारखेनुसार ६ जून व तिथीनुसार ९ जून रोजी आयोजन करण्यात आले आहे. यंदा सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण झाल्याने लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमांची पूर्वतयारी करताना संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या अनुषंगाने सोमवारी (ता. २) नियोजन बैठक झाली. या वेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक आचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) रवींद्र शेळके यांसह विविध सरकारी विभागांचे प्रमुखअधिकारी उपस्थित होते.
सूर्यवंशी म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी दरवर्षी राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी रायगड किल्ल्यावर येतात. गतवर्षी सुरक्षा व पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला होता. हा अनुभव लक्षात घेत, यंदा कोणतीही समस्या उद्भवू नये या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी पूर्वतयारी केली जावी. वाहनांचे पार्किंग, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी, असे सूचित केले.
महाड व माणगावमार्गे येणाऱ्या खासगी वाहनांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यांची कामे, पार्किंगच्या जागा व तेथून गडाकडे जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था संबंधित विभागांनी करावी. आवश्यक माहिती फलक लावले जावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासन सज्ज आहे. यंदा सुमारे दोन ते तीन लाख शिवप्रेमी रायगड किल्ल्यावर येतील, असा अंदाज आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यातून १५०० पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतील. किल्ल्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस व स्वयंसेवक नियुक्त असतील. वाहतूक पोलिस कोंडी होऊ नये, यासाठीही विशेष नियोजन केले आहे.
- आचल दलाल, अधीक्षक, रायगड पोलिस
शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण झाल्याने येथील कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी येणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शिवप्रेमींची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येणार आहे. या वेळी पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता अशा प्रकारच्या मूलभूत सुविधांकडे काटेकोरपणे लक्ष देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन शिवप्रेमींचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे.
- किशन जावळे, जिल्हाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.