मिरा-भाईंदरमध्ये ध्वनी प्रदूषणाचा दणदणाट

मिरा-भाईंदरमध्ये ध्वनी प्रदूषणाचा दणदणाट

Published on

भाईंदर, ता. ५ (बातमीदार) : मिरा-भाईंदरमध्ये ध्वनिप्रदूषणाने मर्यादा ओलांडली आहे. महापालिकेने गुरुवारी (ता. ५) जाहीर केलेल्या पर्यावरण अहवालात नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे शहरातील काही जलस्रोतही मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहेत. विशेषकरून गणेशोत्सवानंतर या प्रदूषणात वाढ झाली, असे नमूद करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे हा अहवाल २०२३-२४ या वर्षासाठीचा असून, अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी महापालिकेने तब्बल एक वर्षाचा विलंब केला आहे.

शहरातील ध्वनी पातळी तपासण्यासाठी महापालिकेकडून १३ ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले. त्यात काशि-मीरा चौक व मीरा रोड रेल्वे स्थानक परिसरात अनुक्रमे ७३.४ व ९४.६ डेसिबल सर्वाधिक ध्वनिप्रदूषण होत असल्याचे दिसून आले आहे. ध्वनी पातळीची मर्यादा ६५ डेसिबल असते. दरम्यान, या दोन्ही ठिकाणी ध्वनी पातळीने ही मर्यादा पार केल्याचे दिसत आहे. घोडबंदर येथील फाउंटन हॉटेल व भाईंदर पूर्व येथील केबिन रोड परिसरातही ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून, या ठिकाण्णी अनुक्रमे ७२.३ आणि ६९.८ डेसिबल ध्वनी पातळी आहे. उत्तन नाका व पाली चर्च या दोनच ठिकाणी ध्वनी पातळी मर्यादेच्या आत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सणासुदीच्या काळात या ध्वनिप्रदूषणात आणखी वाढ होत आहे. ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक तणाव, निद्रानाश, उच्च रक्तदाब, हृदयविकार, ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम अशा आरोग्य समस्या तसेच वन्यजीव, पशुपक्ष्यांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ध्वनी पातळी नियंत्रित करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी, जनजागृती व ध्वनी मर्यादा पाळण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पर्यावरण अहवालात म्हटले आहे.

घोडबंदर, रेती बंदर खाडी, भाईंदर पश्चिम धक्का, घोडबंदर स्मशानभूमी नदी हे सर्वाधिक प्रदूषित जलस्रोत असून, त्यात जैविक व रासायनिक प्रदूषण अधिक आहे. खाड्यांचे पाणी पुढे अरबी समुद्राला मिळत असल्याने या प्रदूषणामुळे जलस्रोतांची मोठी हानी होत आहे.

मूर्ती विसर्जनावर खापर
मिरा-भाईंदर शहरातील विविध तलावांमधील पाण्याची गुणवत्ता चांगली आहे. असे असले तरी हे पाणी पिण्यासाठी योग्य नसून ते केवळ मनोरंजनात्मक वापरासाठी योग्य असल्याचा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला आहे. गणेशमूर्ती विसर्जनानंतर पाण्याच्या गुणवत्तेत मोठ्या प्रमाणात फरक पडतो. शहरात नैसर्गिक खाड्या, नैसर्गिक तलाव व कृत्रिम तलाव अशा २३ ठिकाणी विसर्जन व्यवस्था केली जाते. त्यातील भाईंदर पश्चिमेकडील राव तलाव व मोर्वा गावातील तलाव सर्वाधिक प्रदूषित असून, गणपतीमूर्ती विसर्जनानंतर त्यात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

कृत्रिम तलावांचा वापर आवश्यक
जल प्रदूषणामुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता, आरोग्यविषयक समस्या, जलचर प्रजातींवर परिणाम, जैवविविधतेचा ऱ्हास आदी परिणामांना सामोरे जावे लागते. यासाठी मूर्ती विसर्जनासाठी नैसर्गिक जलस्रोतांचा वापर बंद करून गणपती विसर्जन केवळ कृत्रिम तलावातच करणे व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com