शाश्वत शेतीचा नवा अध्याय :

शाश्वत शेतीचा नवा अध्याय :

Published on

शाश्वत शेतीचा नवा अध्याय
विकसित कृषी संकल्प अभियानास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद
ठाणे, ता. ८ (बातमीदार) ः आधुनिक शेती, शाश्वत पशुपालन आणि विज्ञानाधारित कृषी विकासाच्या दिशेने ठाणे जिल्ह्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) अंतर्गत २९ मे ते १२ जून या कालावधीत जिल्ह्यात ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ उपक्रम राबविण्यात येत आहे. याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, हा उपक्रम ग्रामीण भागात नवा आशावाद घेऊन आला आहे.
या अभियानाच्या अनुषंगाने अलीकडेच अटारी, पुणे येथील संचालक डॉ. एस. के. रॉय आणि सीरकॉट, मुंबईचे संचालक डॉ. एस. के. शुक्ला यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन सहभाग नोंदवला. रविवारी (ता. ८) डॉ. रॉय यांनी ठाण्यातील रॅलीमध्ये सहभाग घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी यांत्रिकीकरण, आधुनिक शेती उपकरणांचा वापर, मूल्यवर्धन आणि तंत्रज्ञानाधारित शेती पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले. याच वेळी डॉ. शुक्ला यांनी कोकणातील हवामान व भौगोलिक परिस्थितीनुसार शेतीमाल उत्पादनासाठी योग्य पर्यायांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
गेल्या १० दिवसांत कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड आदी तालुक्यांतील सुमारे ६० गावांमध्ये विविध उपक्रम व थेट शेतकरी संवादाचे आयोजन करण्यात आले. ‘विद्यापीठातील संशोधन शेतकऱ्यांच्या दारी’ या संकल्पनेवर आधारित अभियानात कृषी, दुग्धव्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आणि शेळीपालन या विषयांतील तज्ज्ञांनी शेतकरी, पशुपालक आणि महिला बचत गटांशी थेट संवाद साधला. शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करताना, विशेषतः बीज प्रक्रिया, सुधारित लागवड पद्धती, वेळेवर पेरणी, उगम क्षमता, कीड व रोग नियंत्रण, सेंद्रिय शेतीच्या तंत्रांवर भर देण्यात आला. तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.
या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी कृषी विज्ञान केंद्र, ठाणेचे प्रमुख डॉ. सुरेश जगदाळे हे अधिष्ठाता डॉ. शैलेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करत आहेत. या मोहिमेत डॉ. हांडे, डॉ. गुडेवार, डॉ. मेश्राम, डॉ. संग्राम चव्हाण, डॉ. कदम, डॉ. गोळे, डॉ. शाहीर गायकवाड, डॉ. सावंत यांच्यासह आयसीएआर व कृषी विभागातील अधिकारी कार्यरत आहेत.
मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने ‘एक जिल्हा, एक अधिकारी’ या उपक्रमांतर्गत कोकण विभाग तसेच नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com