एक लाख ८१ हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके

एक लाख ८१ हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके
Published on

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ११ : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास केवळ काही दिवस उरले असल्यामुळे शिक्षण विभागाची जय्यत तयारी सुरू आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव राबविण्यात येणार असून, शाळांचा परिसर सजविण्यासोबत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत, प्रभातफेरी, पुस्तके तसेच गणवेश वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर एकही बालक शाळाबाह्य राहणार नाही याची काळजी घेतली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी दिली.
राज्यात १६ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून, रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना सरकारकडून पाठ्यपुस्तके देण्यात येतात. ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळतील, असे नियोजन करण्यात येत आहे. बालभारती विभागाकडे शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी केली होती. सरकारकडून पुस्तके प्राप्त झाली असून, ही पुस्तके तालुक्याच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत केंद्रप्रमुख व केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात येत आहेत. रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या एक लाख ८१ हजार ५४८ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे; तर ९८ हजार ५७२ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येणार आहे.
----------------------
प्रवेशप्राप्त मुलांच्या याद्या जाहीर
जिल्ह्यात एकही शाळाबाह्य विद्यार्थी राहणार नाही, या दृष्टीने शिक्षण विभागामार्फत पावले उचलण्यात येत आहेत. १६ जूनला शाळा सुरू होणार आहेत. त्यापूर्वी ६ ते १४ वयोगटातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नये, यासाठी प्रवेशपात्र बालकांच्या याद्या ग्रामपंचायत व शाळा फलकावर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. प्रवेशपात्र बालकांची यादी ध्वनिक्षेपकावर घोषित केली जाणार आहे.
-------------------------
गृहभेटींचे नियोजन
शैक्षणिक पदयात्रा व शिक्षकांच्या गृहभेटी व सरपंच, गावकरी, व्यवस्थापन समिती सदस्य, युवक, बचत गट, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांच्या गृहभेटींचे नियोजन करण्यात आले आहे. वर्षभर १०० टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची माहिती देणे, तसेच एकही विद्यार्थी शाळेबाहेर राहणार नाही, अशी उपस्थितांसह प्रतिज्ञा घेण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.
-------------------
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी स्वागत करण्यासाठी शाळांना तोरणे लावण्यात येणार आहेत. रांगोळ्या काढण्यात येतील. मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांमार्फत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना पुष्प देऊन स्वागत करण्यात येईल. गावात, वॉर्डात प्रभातफेरी काढण्यात येईल. या प्रभातफेरीत युवक, गावकरी, ज्येष्ठ नागरिकांना प्रभातफेरीमध्ये सहभागी होण्याची विनंती करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले आहे.
- नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com