सायबरच्या चक्रव्यूहात सापडले खबऱ्याचे मारेकरी

सायबरच्या चक्रव्यूहात सापडले खबऱ्याचे मारेकरी

Published on

पाठलाग

सायबरच्या चक्रव्यूहात सापडले खबऱ्याचे मारेकरी

नवनीत बऱ्हाटे
तो रात्रीच्या अंधारात शांतपणे चालत होता. उल्हासनगर कॅम्प ४चा परिचित रस्ता, रोजचाच मार्ग... पण, त्या रात्री काहीतरी वेगळे घडले. काही अज्ञात सावल्या त्याचा पाठलाग करत होत्या. काही क्षणांतच रस्त्यावर रक्ताचे थेंब सांडले आणि राजेश कुकरेजा या व्यक्तीचा जीव एका अमानुष मारहाणीत निघून गेला. कोण होता राजेश? तो गुन्हेगार नव्हता; पण काही गुन्हेगारांसाठी तो मोठा धोका होता. कारण त्याच्यावर पोलिसांचा खबरी असल्याचा संशय होता. या संशयावरून तीन तरुणांनी त्याच्यावर भयंकर हल्ला केला.

१६ जुलै २०२३, मध्यरात्री उल्हासनगर कॅम्प ४ परिसर स्थानिक नागरिकांच्या माहितीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी एका गंभीर मारहाणीची नोंद घेतली. घटनास्थळी गंभीर अवस्थेत सापडलेला व्यक्ती राजेश कुकरेजा होता. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबईतील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. काही तासांतच डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. सुरुवातीला ही हाणामारी पोलिसांनी “चुकून लागलेला धक्का” म्हणून नोंदवली गेली. परंतु, पोलिसांसमोर आलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजने संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलून टाकली. विठ्ठलवाडी पोलिसांच्या तपासाने एक नवा थरार घेतला.
घटना घडली तेथील एका दुकानाबाहेरील सीसीटीव्हीमध्ये दिसलेली दृश्ये थरकाप उडवणारी होती. मनीष दुसेजा, गौरव गोदीया आणि बाळा ऊर्फ समीर गायकवाड या तिघांनी राजेशला रस्त्यावर अडवले आणि थेट लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जमिनीवर कोसळल्यानंतरही मारहाण थांबली नाही, याचा अर्थ स्पष्ट होता की हा अचानक झालेला राग नव्हता. ही आधीपासून आखलेली “खबरी हटाव” मोहीम होती. सीसीटीव्हीमधील दृश्य पाहताच या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस उपायुक्त आणि सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पोलिस अधिकारी रामदास मिसाळ, सुजीत निचिते, हरिश्चंद्र घाणे, गणेश राठोड, समीर गायकवाड, हनुमंत सानप, वैजनाथ राख यांनी तपासाला सुरुवात केली. तपासाच्या प्रत्येक धाग्याला पकडून ठेवला. मोबाइल लोकेशन, कॉल रेकॉर्ड्स, सीसीटीव्ही, रूट मॅपिंग आणि स्थानिक गुन्हेगारी पार्श्वभूमी याचा अभ्यास करत आरोपींच्या हालचालींचा वेध घेतला. गुप्त माहिती आणि नियोजनबद्ध तपासाच्या मालिकेमुळे अखेर आरोपी जाळ्यात अडकले. या हत्येमागे केवळ राग नव्हता. हा एक संदेश होता की, ‘खबरी झाला, तर जगू देणार नाही!’ पण पोलिसांच्या चोख आणि परिपूर्ण तपासाने सिद्ध केले, की गुन्हा कितीही गुप्त असला, तरी तो सत्याच्या उजेडात आलाच पाहिजे.

अखेर गुन्हा दाखल
गुप्त खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेश पोलिसांना स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांच्या हालचालींबद्दल माहिती पुरवत होता. हीच बाब आरोपींना समजली आणि त्यांनी त्याला कायमचा संपवण्याचा कट आखल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. माहितीनंतर पोलिसांनी गुप्त पथके विविध ठिकाणी पाठवली. तिघेही आरोपी वेगवेगळ्या परिसरात लपलेले होते. रात्रीच्या छाप्यांमध्ये, मोठ्या संयोजनाने पोलिसांनी तिघांना अटक केली. तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे.

खाकी पोलिसांचा संयम
ही घटना केवळ एका खबऱ्याचा खून नाही, तर गुन्हेगारीच्या साम्राज्यावर पोलिसांचा सर्जिकल प्रहार आहे. यातून स्पष्ट होते की खबरी मारला गेला, पण पोलिसांचा खाकी संयम आणि तपास यंत्रणा अजूनही मजबूत उभी आहे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com