मुसळधारेने जल‘कोंडी’

मुसळधारेने जल‘कोंडी’

Published on

वसई, ता. १९ (बातमीदार) : वसई-विरार शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. तालुक्यात बुधवार (ता. १८) रात्रीपासून पाऊस धो-धो पडत असल्याने चाकरमानी वर्गाची तारांबळ उडाली होती. अशातच अनेक सखल भागात पाणी साचले असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे दिसून आले. वाहतूक कोंडीमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले.

वसई तालुक्यात पावसाने गेले दोन दिवस संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. शहरातील अनेक भाग जलमय झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. गालानगर, तुळिंज, आचोळे मार्ग, संतोष भुवन, नगिनदास पाडा, नानभाट, निर्मळ, सोपारा, गास यासह विरार, वसई, नायगाव भागात पाणी साचले होते. पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने व्हावा व प्रवासी मार्ग, रहिवासी परिसरात पाणी साचू नये, यासाठी पालिकेचे कर्मचारी जागोजागी तैनात होते. वसई पश्चिमेकडील सनसिटी येथे दरवर्षी पाणी साचते. त्यामुळे नागरिकांचे हाल होतात. वसई-विरार हा मार्ग बंद होतो. त्यामुळे प्रवासीवर्गाला दूरचे वळण घेऊन यावे लागते. दोन दिवसांच्या पावसाने येथील रस्त्याच्या दोन्ही दिशेला पाणी साचले आहे.

वसई-विरार महापालिकेने नालेसफाई व अन्य पावसाळी कामे पूर्ण केल्याचा दावा केला आहे; मात्र जर पावसाने अधिक जोर धरला, तर वसई तुंबण्याची भीती आहे.

महामार्गावरील प्रवास अवघड
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यातच पावसाळ्यात दिलासा मिळेल, वाहतूक सुरळीत होईल, असे वाटत असताना कोंडीने वेढा घातला होता. विरार, नालासोपारा व वसईतून जाणाऱ्या या मार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. त्याचा परिणाम शहरांतर्गतदेखील दिसून आला. जरी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने उपाययोजनांसाठी आढावा घेतला होता, तरी महामार्गावरील समस्या जैसे थे असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

कामण-चिंचोटी मार्गावर नागरिकांचे हाल
पाऊस सुरू असल्याने वसई-कामण व चिंचोटी या मार्गावरून जाताना नागरिकांचे हाल झाले. वाहतूक संथ गतीने सुरू होती. रस्त्यावरून जाताना नागरिकांना काळजी घ्यावी लागत होती.

वाहतूक विस्कळित
वसईत पाऊस आणि वारा जोरदार असल्याने सकाळच्या वेळी वाहतूक कोंडी झाली होती. अनेकांनी वाहन सावकाश चालवत प्रवास केला. रस्त्यावर पाणी साचल्याने गैरसोय निर्माण झाली. महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली. प्रवासासाठी वेळ अधिक लागल्याचे प्रवाशांनी सांगितले.

आपत्कालीन यंत्रणा सज्ज
वसई-विरार शहरात मालमत्ता व जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. अग्निशमन दलासह आरोग्य व स्वच्छता विभाग यंत्रणा सतर्क झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com