कोकणात जाणाऱ्या रो-रो बोटीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात
काेकणात गणेशाेत्सवापूर्वी जलवाहतूक सेवा?
रो-रो सेवेच्या चाचण्या अंतिम टप्प्यात; साडेचार तासांत सिंधुदुर्गात
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जलमार्गाने प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता वाढली आहे. मुंबईहून मालवण, रत्नागिरी आणि विजयदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या रो-रो बोट सेवेच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेच. लवकरच ही सेवा प्रत्यक्षात येणार असून, मुंबईतून अवघ्या साडेचार तासांत तळकाेकणातील सिंधुदुर्ग जिल्हा गाठता येणार आहे.
राज्य सरकारच्या मत्स्य व बंदर विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली सागरी महामंडळ आणि एमटूएम कंपनी यांच्यातील करारानुसार ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. मुंबईतील भाऊचा धक्का येथील जहाज स्थानकावर ही अत्याधुनिक रो-रो बोट दाखल झाली असून, पहिल्या टप्प्यात मुंबई ते मांडवादरम्यान यशस्वी चाचणी पार पडली आहे. आता पुढील काही दिवसांत रो-रो सेवेच्या चाचण्या रत्नागिरी, विजयदुर्ग आणि मालवण या तीन प्रमुख बंदरांवर घेतल्या जाणार आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर बोट चालविण्याचा परवाना मिळेल आणि गणेशोत्सवाच्या आधीच नियमित सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वाहनेही नेता येणार
राे-राे बोटीतून प्रवाशांबराेबरच त्यांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वाहतूकही करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कोकणात खासगी वाहनही घेऊन जाता येणार आहे. वाहनांसह जलमार्गे प्रवास केल्याने महामार्गावरील वाहतूक कोंडी, खड्डे आणि रखडलेल्या रस्त्यांच्या समस्यांपासून सुटका होणार आहे.
उच्च क्षमता अन् आधुनिक सोयी-सुविधा
ग्रीसमधून ५५ कोटी रुपये खर्चून नवीन रो-रो बोट खरेदी करण्यात आली आहे. या बाेटीतून सुमारे ५०० प्रवासी आणि १५० वाहने नेण्याची क्षमता आहे. सध्याच्या रो-रो बोटींपेक्षा हिचा वेगही अधिक आहे. या बाेटीचा कमाल वेग ३० सागरी मैल आहे. सेवेदरम्यान सरासरी २४ सागरी मैल या वेगाने धावणार आहे.
काेणत्या सुविधा?
वातानुकूलित विश्रांतीगृह, सुरक्षा सुविधा, शौचालय व्यवस्था, आपत्कालीन बचाव उपकरणे, सीसीटीव्ही, डिजिटल तिकीट अशा सर्व अत्याधुनिक सुविधा प्रवाशांना उपलब्ध असणार आहेत.
पावसाळ्यातही सेवा शक्य
रामदास बोटीच्या अपघातानंतर काही वर्षांपासून पावसाळ्यात फेरी बोटींना बंदी घालण्यात आली होती. नव्या रो-रो बोटीमुळे आता पावसाळ्यातही कोकणाकडे जलवाहतूक शक्य झाली आहे. सागरी महामंडळाने यासाठी विशेष नियोजन केले असून हवामानानुसार सेवा राबवली जाणार आहे.
रत्नागिरीत तीन तासांत
मुंबईतील जहाज स्थानकावर निघाल्यानंतर अवघ्या तीन तासांत रत्नागिरी, तर साडेचार तासांत विजयदुर्ग आणि मालवण गाठता येणार आहे. त्यामुळे वेळेची माेठी बचत हाेणार आहे.
वैशिष्ट्ये
- ५०० प्रवासी आणि १५० वाहनांची क्षमता
- २४ सागरी मैल सरासरी वेग
- सर्व हवामानात सक्षम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

