पालघरमध्ये ‘पर्पल फेअर २०२५’ उत्सव

पालघरमध्ये ‘पर्पल फेअर २०२५’ उत्सव

Published on

पालघरमध्ये ‘पर्पल फेअर २०२५’ उत्सव
दिव्यांग सक्षमीकरणासाठी एक प्रेरणादायी उपक्रम
पालघर, ता. ३० (बातमीदार) ः पालघरमध्ये ‘पर्पल फेअर २०२५’ उत्सव नुकताच मोठ्या उत्‍साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमात दिव्यांग बांधवांचा आत्मसन्मान, आत्मनिर्भरता आणि सामाजिक समावेश या मूल्यांना चालना देण्यात आली.
महाराष्ट्रभर होणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात पालघर जिल्ह्यातून करण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन अली यावर जंग राष्ट्रीय वाचा आणि श्रवण दिव्यांगजन संस्था, बांद्रा मुंबई, जिल्हा परिषद पालघरच्या समाजकल्याण विभागाच्या पुढाकाराने आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली करण्यात आले होते. डॉ. सुमन कुमार, संचालक आणि डॉ. राजू आराख, माजी संचालक अली यावर जंग संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या फेअरमध्ये जिल्हा प्रशासन, दिव्यांग कल्याण विभाग, सामाजिक कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार, विविध स्वयंसेवी संस्था आणि विशेष शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या सदस्या वैदेही वाढाण, निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी सुभाष बागडे, उपायुक्त तथा दिव्यांग पुनर्वसन अधिकारी नितीन ढगे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर, तसेच दिव्यांग सक्षमीकरणासाठी विशेष कार्य करणाऱ्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रमिलाताई कोकड यांच्या उपस्थितीत झाले.
या फेअरमध्ये जिल्हाभरातील १८ शाळांमधील २०७ दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धांमध्ये आपली कला, खेळगुण आणि आत्मविश्वास सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. सॅक रेस, ग्लास मनोरा रचना, फुगे फुगवणे, कॅरम अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग उद्योजक आणि कलाकारांसाठी १७ स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये त्यांच्या उत्पादने आणि कलाकृतींचे सादरीकरण करण्यात आले. एलिम्को संस्थेमार्फत दिव्यांगांना सहाय्यक साहित्याचे वाटपही करण्यात आले.
................
कार्यक्रमात उपस्थितांशी बोलताना रवींद्र शिंदे म्हणाले की, आपण हा दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्सव साजरा करीत आहोत, त्यांच्या आनंदात सहभागी होणे ही आपली जबाबदारी आहे. नितीन ढगे यांनी दिव्यांग मुलांना घरात न ठेवता समाजात घेऊन जाण्याचे आवाहन करताना, समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांचा समावेश करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. वैदेही वाढाण यांनी अली यावर जंग संस्थेच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, शासन आणि संस्था मिळून दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहेत आणि त्यामुळे समाजात सकारात्मक विश्वास निर्माण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com