पाऊले चालली पंढरीची वाट
वैष्णवांचा मेळा निघाला पंढरीस
रायगडमधील हजारो वारकऱ्यांचा सहभाग; रिमझीम पावसात वाटचाल
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २ : टाळ-मृदंगाच्या गजरात रायगड जिल्ह्यातील हजारो वारकरी आषाढी एकादशीसाठी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. दरवर्षी रेवस, बोडणी, नवगाव, वरसोली, रसायनी, पेण, माणगाव, पनवेलमधून अनेक दिंड्या पंढरपूरला जातात. यात लहान बाल वारकऱ्यांसह महिलांची संख्याही लक्षणीय असते.
महाड तालुक्यातील गांधारपाले येथील पायी वारीला ९१ वर्षांची परंपरा आहे. याशिवाय विन्हेरे, आंबवडे, शिरवली, कोलाड, इंदापूर, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, गांधारपाले, वहूर, वरंध, पोलादपूर या भागातून हजारो वारकरी पंढरपूरकडे निघाले आहेत. रोहा तालुक्यातील संभे येथून आळंदीपर्यंत पायी दिंडी सोहळा २२ वर्षांपासून आयोजित केला जात आहे. पंढरपूरच्या वारीसाठी मध्य रेल्वेकडूनही दरवर्षी विशेष गाड्यांची सोय केली जाते. यंदा सुमारे ८० विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने ६० बस उपलब्ध करून दिल्या आहेत, तर काही वारकरी टेम्पो आणि खासगी वाहनातून दिंडीत सहभागी झाले आहेत.
संतांच्या पालख्या पाहण्याची धडपड
आषाढी एकादशीसाठी पोयनाड परिसर आणि ग्रामीण भागातील भाविक पंढरपूरला रवाना होत आहेत. काही समूहाने, तर काही खासगी वाहनाने रवाना झाले आहेत. शनिवारी सर्व संतांच्या पालख्या वाखरी येथून पंढरपूरला जाणार आहेत. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी अनेक जण गुरुवार, शुक्रवारी पंढरपूरला जाणार आहेत. पंढरपूरला होणारी गर्दी आणि दर्शनरांग लक्षात घेता पोयनाड परिसरातील अनेक भाविक आधीच पंढरपूरला जाऊन दर्शन घेऊन आले आहेत, तर काही जण समूहाने एसटीने पुणे व पुढे पंढरपूर यात्रा विशेष गाडीने जाणार असून, पंढरपूरमधील भक्तनिवास आणि धर्मशाळेत त्यांचा मुक्काम असेल.
सोमवारपासून परतीचा प्रवास
पोयनाड, देहेन, शहापूर, कोपर, चरी, तळाशेत, कुर्डुस या परिसरातील भाविक हे विशेषकरून आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणार आहेत. विठ्ठलाच्या मुख्य दर्शनाला तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने भाविक कळसाचे दर्शन घेऊन परततात. हे सर्व भाविक सोमवार ७ जुलैला परतीचा प्रवास करणार आहेत.
दिंडींचे अचूक नियोजन
वर्षानुवर्षे जाणाऱ्या दिंडींचे नियोजनही महिनाभरापासून सुरू असते. रायगड जिल्ह्यातून जाताना त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले जाते. त्याच ठिकाणी काही दानशूर व्यक्तींकडून चहापाण्याची व्यवस्था, अन्नछत्र आयोजित केले जाते. घाटमाथ्यावर पोहोचल्यावर त्यांचेबरोबर आणलेल्या ट्रकमध्येच साहित्य असते. ठरावीक मुक्कामी पोहोचल्यावर वारकरी खाण्यापिण्याची तयारी करतात. काहीजण कणिक मळतात, तर कुणी चपात्या लाटत असल्याचे चित्र दिसत असल्याचे संकेत पाटील या वारकऱ्याने सांगितले.
कसा आहे दिनक्रम
वारकऱ्यांच्या जेवणाची वेळ ठरलेली असते. सकाळी काकड आरती आणि न्याहारीनंतर ते चालण्यास सुरुवात करतात. दुपारी वाटेत विसावा घेऊन किंवा मुक्कामाच्या ठिकाणी भोजन करतात. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन झाल्यावर जेवणाची सोय असते. अन्न-औषध प्रशासन वारीतील अन्न आणि पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठीही कार्यरत असते, जेणेकरून वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असल्याची माहिती डॉ. ऋषीकेश झावरे यांनी दिली. ते अलिबागमधून सातत्याने वारीत सहभागी होत असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.