बारवी धरण ५७ टक्के भरले
बारवी धरण ५७ टक्के भरले
गेल्या वर्षीपेक्षा समाधानकारक स्थिती
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : ठाणे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस सुरू आहे. धरण परिसरातदेखील पाणीपातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्याची तहान भागविणारे बारवी धरण ५७ टक्के भरले असून, मागील वर्षीपेक्षा समाधानकारक स्थिती असल्याचे म्हटले जात आहे. मागील वर्षी याच दिवशी बारवी धरणात २७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. बारवी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून, मागील २४ तासांत बारवी धरण परिसरात ६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात १९३.१५ घनमीटर पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात जुलै अखेरीस ३० टक्के अधिकचा पाणीसाठा आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास जुलैअखेरीस अथवा ऑगस्टच्या सुरुवातीला बारवी धरण भरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ठाणे जिल्ह्याच्या जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने जिल्ह्याची तहान भागविणारे बारवी धरण कधी भरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक आहे. यंदाच्या वर्षात बारवी धरणातील पाणीसाठा मे महिन्यात २५ टक्क्यांपर्यंत खाली आला होता; मात्र सुदैवाने पाणीकपात करण्याची वेळ आली नाही.
पावसाने यंदा लवकर हजेरी लावली असून, धरण परिसरात पाऊस जोरदार असल्याने जून मध्येच बारवी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. जूनमधील पाऊस पाहता जुलैमध्येच बारवी धरण ओव्हरफ्लो होईल, असे म्हटले जात होते; मात्र मध्यंतरी पावसाने उघडीप दिली. यानंतर श्रावणातील सरीसारखा पाऊस सुरू होता. जुलैच्या सुरुवातीपासून पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरी पडू लागल्या आहेत. बारवी धरण क्षेत्र परिसर, मुरबाड तालुका आणि आसपासच्या भागातदेखील समाधानकारक पाऊस सुरू आहे. यामुळे बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस
बारवी पाणलोट क्षेत्रात ३ जुलैला ६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात १९३.१५ घन मीटर पाणीसाठा झाला असून, ५७ टक्के धरण भरले आहे. मागील आठवड्यात धरणात १७२.६७ घनमीटर पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक वाढ आहे. गेल्या वर्षी ३ जुलैला धरणात २७ टक्के इतका पाणीसाठा होता. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्रा धरणात ६१ टक्के पाणीसाठा आहे, तर मध्य वैतरणात ५४ टक्के, भातसा धरणात ५३ टक्के, मोडकसागर धरणात ५७ टक्के आणि तानसा धरणात ४५ टक्के पाणीसाठा सध्याच्या घडीला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.