महावितरण कार्यालयात तक्रारीची ठराविक वेळ!

महावितरण कार्यालयात तक्रारीची ठराविक वेळ!

Published on

मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. ६ : शहरात महावितरण कर्मचारी मनमानी कारभार करताना दिसून येत आहेत. तक्रार सोडवण्यासाठी आलेल्या ग्राहकांना, ठराविक वेळ सांगून बोलवण्यात येते. त्या‍ वेळेनंतर येणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारी घेण्यासाठी आणि निवारण्यासाठी मनाई केली जात आहे. या संदर्भात वरिष्ठांना विचारले असता ठराविक वेळेचा असा कोणताही निर्णय महावितरण कार्यालयात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. महावितरण कर्मचाऱ्यांचा हा मनमानी कारभार समोर आला आहे.
बदलापूर पश्चिम सोनिवली येथील महावितरण कार्यालयात तक्रार घेण्याची वेळ ही सकाळी १० ते दुपारी २ आणि जेवणाच्या वेळेनंतर दुपारी २.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आहे. अशा आशयाचा संदेशही चिकटवण्यात आला आहे. साधारण सायंकाळी ४ वाजल्यानंतर आलेल्या कोणत्याही ग्राहकाची तक्रार महावितरण कर्मचाऱ्यांकडून घेतली जात नाही. ४ वाजल्यानंतर आलेल्या ग्राहकांना माघारी फिरावे लागते. कित्येकदा ग्राहक आपल्या नोकरीच्या ठिकाणाहून अर्ध्या दिवसाची रजा घेऊन साधारण चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास महावितरण कार्यालयात तक्रार घेऊन येतात. मात्र, चारनंतर तक्रारच घेत नसल्यामुळे, ग्राहकांची मोठी अडचण होते. यावेळी कार्यालय बंद होण्याची वेळ ६ वाजताची असताना, तेवढ्या वेळेत फक्त पाच मिनिटे समस्या ऐकून तक्रार घेण्याची विनंती केली; मात्र महावितरणचे कर्मचारी अरेरावीच्या भाषेत उत्तर देऊन माघारी पाठवत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे.
या संदर्भात वरिष्ठांना विचारणा केली असता, ग्राहक तक्रार निवारणाची वेळ सरकारकडून ठरलेली नाही किंवा तशा स्वरूपाचा अध्यादेश पारित केलेला नाही. असे असताना केवळ आपल्या सोयीनुसार कर्मचाऱ्यांनी ही वेळ ठरवली आहे. कार्यालयाबाहेर लावण्यात आलेला संदेश फलकावर कोणाच्याही परवानगीशिवाय थेट आदेशावरून असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्रासलेल्या ग्राहकांनी महावितरण कार्यालयात कर्मचाऱ्यांवर विरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे.

नोकरीवरून अर्धा दिवसाची सुट्टी घेऊन वीजसंदर्भातील तक्रार देण्यासाठी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास महावितरण कार्यालयात आलो. येथील कर्मचाऱ्यांनी वेळेसंदर्भात लावलेली सूचना दाखवली. यावर फक्त पाच मिनिटे तक्रार घ्या, अशी विनंती केल्यावर येथील महिला कर्मचारी उद्धट भाष्य करू लागल्या. यासंदर्भात येथील उपअभियंत्यांकडे तक्रार दिली. ऊर्जामंत्र्यांनी या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायद्याचा धाक बसवावा.
- विजय गायकवाड, ग्राहक

महावितरण प्रशासनाने ग्राहक तक्रारीसाठी कोणतीही वेळ निश्चित केलेली नाही. सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालय सुरू असताना, कोणत्याही वेळेत ग्राहकांची तक्रार ऐकून घेतलीच पाहिजे, असा नियम आहे. मात्र, बदलापूर शहरात महावितरण कार्यालयात जर असा प्रकार सुरू असेल आणि ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत असेल तर वरिष्ठांना या संदर्भात तक्रार देऊन येथील कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.
- विजय दूधभाते, जनसंपर्क अधिकारी महावितरण, कल्याण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com