आदिवासी शेतकऱ्यांची "राबविरहित" भात शेतीकडे वाटचाल.

आदिवासी शेतकऱ्यांची "राबविरहित" भात शेतीकडे वाटचाल.

Published on

आदिवासींची राबविरहित भातशेतीकडे वाटचाल
कृषी विद्यापीठ आणि कृषी संशोधन केंद्राकडून तंत्रज्ञान विकसित
वाणगाव, ता. ७ (बातमीदार) ः जिल्ह्यातील शेतकरी हा आधुनिक विचारसरणीचा असला तरी भात रोपवाटिका तयार करण्याच्या बाबतीत वडिलोपार्जित शेती पद्धतीचा अवलंब करतात; परंतु याचा विपरीत परिणाम शेती उत्पादनावर आणि जमिनीच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत कृषी विद्यापीठ आणि पालघरच्या कृषी संशोधन केंद्राने शेतकऱ्यांना भातशेतीचे शाश्वत उत्पादन मिळावे, या दृष्टिकोनातून राबविरहित भात रोपवाटिका तंत्रज्ञान विकसित केले आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व अखिल भारतीय समन्वित भारतीय कृषी अनुसंधान परिषदअंतर्गत कृषी संशोधन केंद्र, पालघर येथे कार्यरत असलेली एकात्मिक शेती पीक पद्धतीनुसार शेतकऱ्यांच्या शेतावरील प्रयोग या योजनेद्वारे डहाणू तालुक्यातील वणई, डेहणेपळे, साखरे व इतर भागातील आदिवासी शेतकरी बांधवांची राबविरहित भातशेतीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी भात रोपवाटिका तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतात राब भाजणे या पद्धतीचा अवलंब करीत असतात. यामुळे जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंचे आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी झाले आहे. कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या राबविरहित भात रोपवाटिका तयार करण्याची पद्धत थेट शेतात प्रात्यक्षिकाद्वारे पोहोचवल्यामुळे यावर शेतकऱ्यांचा विश्वास निर्माण झाला आहे. शेतकरी स्वतः पुढाकार घेऊन राबविरहित भात रोपवाटिका तयार करीत आहेत.

राब भाजणीचे दुष्परिणाम
राब केल्याने किंवा शेतजमीन भाजल्याने जमिनीतील शेतीसाठी उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात. परिणामी, शेतीस पोषण व सेंद्रिय घटक मिळत नाहीत. जमिनीला भुसभुशीत करणारे गांडूळ वर्गातील प्राण्यांच्या जाती नष्ट होत आहेत. राब भाजणीसाठी झाडांची तोड होते, प्रदूषण वाढते, परिणामी पर्यावरणाचे संतुलन बिघडते. शेतकऱ्यांचा पैसा व श्रम अधिक लागतो. राब भाजल्यामुळे जंगल, बागा यांना वणवा लागण्याची शक्यता असते. वणव्यामुळे वन्यप्राण्यांचा अधिवासही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

आदिवासी शेतकऱ्यांना नवीन भात रोपवाटिका व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास यशस्वीरीत्या प्रवृत्त केले आहे. शेतकऱ्यांना भाताचे शाश्वत उत्पादन घेण्यासाठी पालघरचे कृषी संशोधन केंद्र शास्त्रज्ञांच्या मदतीने युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. राबविरहित भात रोपवाटिका तंत्रज्ञान हे शेतकरी इतर आदिवासींपर्यंत स्वतःहून पोहोचवत आहेत आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या राबविरहित भात रोपवाटिका तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करावा.
- डॉ. अमोल दहिफळे, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, पालघर

फोटो ओळ ः
आदिवासी शेतकऱ्यांनी राबविरहित भातशेती तंत्रज्ञानाचा वापर करून भात रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com