कोपरखैरणेत वाहतूक कोंडीची समस्या
कोपरखैरणेत वाहतूक कोंडीची समस्या
रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्त पार्किंग; वाहनचालकांची गैरसोय
तुर्भे, ता. ७ (बातमीदार) ः कोपरखैरणे विभागात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या वाढत चालली आहे. पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहनचालकांना रस्ता अधिक तोकडा पडत असून दिवस-रात्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
कोपरखैरणेमधील डी-मार्ट सर्कल ते यशवंतराव चव्हाण शाळेपर्यंतच्या दोन्ही बाजूला सम-विषम पार्किंगचे नियम सध्या लागू आहेत; परंतु सकाळी नऊ ते दुपारी एक तर सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते; मात्र त्याच वेळी रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. कोपरखैरणे विभागात वाहनांच्या पार्किंगकरिता कोपरखैरणे रेल्वेस्थानकाबाहेर एकमेव ‘पे अँड पार्क’ची व्यवस्था उपलब्ध आहे. संपूर्ण कोपरखैरणे भागात इतर कोणत्याच ठिकाणी वाहनतळ उपलब्ध नाही. तसेच कोपरखैरणेमधील बहुतांशी गृहसंकुलातील नागरिक, ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक रस्त्यावरच बिनधास्तपणे वाहने उभी करीत आहेत. कोपरखैरणे सेक्टर २२ येथून हॉटेल ब्ल्यू डायमंड ते कोपरखैरणे तीन टाकीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जातात. हॉटेल ब्ल्यू डायमंड ते कोपरखैरणे तीन टाकीदरम्यानचा रस्ता वाशी, एपीएमसीमधील वाहनचालकांसाठी सोयीचा आहे. शिवाय, हा रस्ता घणसोली, महापे, ऐरोली, मुलंड यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या भागात नेहमीच वाहनांची वर्दळ असते; मात्र बेशिस्त पार्किंगमुळे या मार्गावर दिवस-रात्र कोंडी असते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनचालकांसह स्थानिकांकडून केली जात आहे.
..........
शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात वाढतोय धोका!
वाशी, ता. ७ (बातमीदार) ः नवी मुंबई शहरातील शाळा, महाविद्यालयाबाहेर मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह वाहनचालकांना बसत आहे; मात्र याकडे शाळा व्यवस्थापनासह वाहतूक विभाग दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तर आप्तकालीन परिस्थितीमध्ये एखाद्या रुग्णाचा जीवदेखील जावू शकतो, असे सांगण्यात येत आहे.
नवी मुंबईतील वाशी, सानपाडा, बेलापूर, ऐरोली, कोपरखैरणे आदी ठिकाणी अंतर्गत असणाऱ्या खासगी शाळांमुळे रस्ते जाम होत आहेत. शाळा व कॉलेज सुटल्यानंतर विशेषतः या वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावतो. अनेक शाळांबाहेर पार्किंगची सोय नसल्याने विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी येणाऱ्या गाड्यांमुळे अंतर्गत वाहतुकीला फटका बसतो. या काळात वाहतूक पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन होताना दिसून येत नाही. तर कॉलेजमध्ये पार्किंगची सोय नसल्याने अनेक दुचाकी बाहेर रस्त्यावर कशाही पद्धतीने पार्क केल्या जातात. त्यामुळे स्थानिकांसह वाहनचालकांची कोंडी होत आहे. ऐरोलीमध्ये श्रीराम विद्यालय, सेट झेवियर्स, सरस्वती विद्यालय, तसेच मेहता कॉलेज, दत्ता मेघे इंजिनियरिंग, घणसोलीमधील न्यू बॉम्बे स्कूल, कोपरखैरणेमधील लोकमान्य टिळक स्कूलबाहेर नेहमीच वाहतूक कोंडी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.