‘मराठी’च्या मोर्चाला परवानगी नाकारली

‘मराठी’च्या मोर्चाला परवानगी नाकारली

Published on

‘मराठी’च्या मोर्चाला परवानगी नाकारली
पोलिसांच्या सर्व प्रमुख नेत्यांना नोटिसा; आंदोलनकर्ते ठाम

भाईंदर, ता. ७ (बातमीदार) : मराठीच्या मुद्द्यावर मनसैनिकांकडून दुकानदारला केलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर स्थानिक व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला होता. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी (ता. ८) सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचे मनसेकडून घोषित करण्यात आले होते; मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून, सर्व प्रमुख नेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, परंतु मोर्चा काढण्यावर आंदोलक मात्र ठाम आहेत. त्यातच पोलिसांनी मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यावर मिरा-भाईंदर शहरात प्रवेश करण्यावर एक दिवसाची बंदी घातली आहे.

मनसैनिकांनी मराठीच्या मुद्द्यावरून मिरा रोडमधील एका मिठाई विक्रेत्याला मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हे दाखल केले, मात्र त्यानंतरही व्यापाऱ्यांनी मोर्चा काढण्याचे जाहीर केले. त्या मोर्चालादेखील पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी पदयात्रा काढून एक जाहीर सभा घेतली. हा मोर्चा भाजपप्रणित असल्याचा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला होता. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मराठीवर प्रेम करणाऱ्यांचा सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येईल, असे मनसेकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी (ता. ८) सकाळी १० वाजता ज्या दुकानदाराला मारहाण झाली होती; त्याच ठिकाणाहून म्हणजे मिरा रोडच्या बालाजी हॉटेल चौकातून हा मोर्चा निघणार असून, तो मिरा रोड रेल्वेस्थानकाबाहेर समाप्त होणार आहे, या मोर्चामध्ये विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, मराठी भाषिक व मराठीवर प्रेम करणारे सहभागी होणार आहेत. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी आंदोलनकर्ते मोर्चा काढण्यावर ठाम आहेत.

...तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई
संबंधित मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकरण्यात आली असून, सर्व प्रमुख नेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी मोर्चाला परवानगी नाकरण्यात आली असून, त्यानंतरही मोर्चा काढण्यात आला, तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली.

नोटिसा मिळाल्यामुळे थांबणारे आम्ही नाही, मराठी अस्मितेसाठी ठरलेल्या वेळी हा मोर्चा काढला जाईल, त्यात सर्वपक्षीय लोक सहभागी होतील, या मोर्चात आपण सहभागी होऊ नये, यासाठी आपल्यावर घालण्यात आलेली प्रवेशबंदी हा अन्याय आहे. व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चा प्रकरणात पोलिसांनी किती जणांवर गुन्हे दाखल केले. आपण ठरल्यानुसार मोर्चात सहभागी होणार असून, पोलिसांनी हवे तर अटक करावी.
- अविनाश जाधव, नेते, मनसे,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com