मिरा रोडला मराठीसाठी भव्य मोर्चा
मिरा रोडमध्ये मराठीसाठी भव्य मोर्चा
पोलिसांची दडपशाही झुगारून एकजुटीचे दर्शन
भाईंदर, ता. ८ (बातमीदार) : मिरा रोड येथे मंगळवारी (ता. ८) मराठीसाठी निघणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, पहाटेपासून कार्यकर्त्यांची धरपकड केली, तरीही मराठीप्रेमी आंदोलकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत भव्य मोर्चा काढला. दहा वाजल्यापासून शेकडो कार्यकर्त्यांचा अखंड ओघ सुरू होता. पोलिसांनी नाकेबंदी केली, अनेकांना ताब्यात घेतले; तरीही ते मोर्चा रोखू शकले नाहीत. मराठीप्रेमींनी एकजुटीचे दर्शन घडवले. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. मोर्चाला पाठिंबा देण्यास आलेल्या परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना घोषणाबाजी करीत माघारी जाण्यास भाग पाडले. मराठीच्या मुद्द्यावर पुन्हा असे काही घडले तर असेच मोर्चे निघतील, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या मिरा रोडमधील व्यापाऱ्याला मनसैनिकांकडून मारहाण करण्यात आल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी परवानगी नसतानाही मोर्चा काढला. त्याला प्रत्युत्तर म्हणून मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मराठी एकीकरण समितीने घोषित केले. त्याला ठाकरे गटासह, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनीदेखील पाठिंबा दिला; मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली व सर्व महत्त्वाच्या नेत्यांना नोटिसा बजावल्या. मनसेचे अविनाश जाधव यांच्यासह काही मनसे व मराठी एकीकरण समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मंगळवारी पहाटेच घरातून ताब्यात घेतले. त्यामुळे मोर्चा निघेल की नाही, यावर साशंकता व्यक्त केली जात होती; मात्र आंदोलकांनी हा समज खोटा ठरवला.
मोर्चा मिरा रोडच्या बालाजी हॉटेल चौकातून निघणार होता. या ठिकाणी पोलिसांनी सकाळपासूनच मोठा फौजफाटा तैनात केला. त्यामुळे परिसराला अक्षरशः पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. संपूर्ण परिसरावर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येत होती. मोर्चाच्या ठिकाणी येत असलेल्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. या परिसरातील दुकानेही बंद ठेवण्यात आली होती.
मोर्चेकरी दहानंतर गटागटाने चौकात जमा होऊ लागले. मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी परत जावे, अशी पोलिसांकडून सारखी उद्घोषणा केली जात होती; मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांची धरपकड करायला सुरुवात केली. तरीदेखील कार्यकर्ते आंदोलनाच्या ठिकाणी येतच राहिले. पोलिस एका ठिकाणच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असतानाच दुसऱ्या ठिकाणी आंदोलक येऊन थडकू लागले. मिरा-भाईंदरसह मुंबई व ठाण्यातूनही मनसे व ठाकरे गटाचे कार्यकर्ते मिळेल त्या मार्गाने मिरा रोडमध्ये दाखल होत होते. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची अक्षरश: धावपळ उडत होती. आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांच्या गाड्या, बस, रिक्षा तैनात ठेवण्यात आल्या होत्या; मात्र त्यादेखील कमी पडू लागल्या. व्यापाऱ्यांच्या मोर्चात पोलिसांनी कोणाचीही धरपकड केली नाही; मग आम्हालाच अटक का करता, असा संतप्त सवाल करीत मराठी माणसाची ही गळचेपी असून सरकार दडपशाही करीत आहे, असा आरोप आंदोलक करीत होते. या सर्वांमुळे वातावरणात तणाव वाढू लागला. तरीदेखील पोलिसांनी संयम दाखवून कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला.
...
मोर्चाला विशाल स्वरूप
धरपकड करण्यात आलेले आंदोलक अचानक मोठ्या संख्येने चौकात जमा झाले असता त्यांना अडवण्यासाठी पोलिस धावले; परंतु आंदोलकांपुढे पोलिस हतबल झाले. जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी ठरविलेल्या मार्गावरून मोर्चा काढला. थोड्याच वेळात या मोर्चात शेकडोंच्या संख्येने आंदोलक दाखल होत गेले. त्यामुळे मोर्चा मिरा रोड रेल्वेस्थानकाजवळ पोहोचेपर्यंत मोर्चाला विशाल स्वरूप आले. रेल्वेस्थानकाबाहेर असलेल्या शहीद स्मारकात जमून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
...
ज्येष्ठ नेत्यांंचा सहभाग
शहीद चौकात आलेल्या मोर्चात मनसेचे नेते अभिजित पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे, विनोद घोसाळकरदेखील सहभागी झाले. त्यामुळे आंदोलकांना आणखी जोर आला. जोपर्यंत मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिस सोडत नाहीत, तोपर्यंत मोर्चा संपणार नाही, असे या वेळी घोषित करण्यात आले. पोलिसांनी जाधव यांच्यासह मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना सोडल्यानंतर मोर्चाची सांगता झाली.
...
दबाव झुगारून मराठी माणूस मोर्चात
मोर्चा निघू नये, यासाठी गृहखाते व पोलिसांचा दबाव होता; मात्र हा दबाव झुगारून मराठी माणूस मोर्चात सहभागी झाला. यावरून मराठी माणसाची मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकजूट आहे, हे स्पष्ट झाले आहे. मराठी माणसाच्या नादी लागू नका, मराठी भाषेच्या मुद्द्यावर पुन्हा असे काही घडले तर याच पद्धतीने मोर्चे काढले जातील, याची सरकारने दखल घ्यावी, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला. त्याचप्रमाणे मोर्चाला परवानगी नाकारणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर मुख्यमंत्र्यांनी निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
...
...म्हणून परवानगी नाकरली!
मोर्चा काढण्याचा जो मार्ग निश्चित करण्यात आला होता तो परिसर संवेदनशील होता. हा मार्ग बदलण्याची सूचना करण्यात आली होती; मात्र आंदोलकांनी ती मानली नाही. तसेच आंदोलनादरम्यान काहीतरी घडण्याचा गोपनीय अहवालदेखील मिळाला होता. यासाठी मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती, अशी माहिती पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी दिली.
...
प्रताप सरनाईक यांना जोरदार विरोध
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक या मोर्चाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी शहीद चौकात आले असता त्यांना जोरदार विरोध करण्यात आला. त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आली. वातावरण बिघडत असलेले पाहून सरनाईक यांनी परत जाण्याचा निर्णय घेतला.
‘‘आपल्याविरोधात घोषणाबाजी होईल, याची पोलिसांनी आधीच कल्पना दिली होती; मात्र मराठीसाठी व मोर्चेकऱ्यांना शब्द दिला होता. त्यामुळे आपण त्या ठिकाणी गेलो. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मनसे व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोडविण्यासाठीदेखील आपण स्वत: पोलिस ठाण्यात गेलो होतो. ठाकरे व मनसेच्या शहराबाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात व माझ्या कार्यकर्त्यांत वाद होऊ नयेत व शहराचे वातावरण गढूळ होऊ नये, यासाठी आपण परत जाण्याचा निर्णय घेतला,’’ असे सरनाईक यांनी सांगितले.
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनीदेखील झालेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रताप सरनाईक हे मराठी माणूस म्हणून आले होते. त्यांच्या बाबतीत असे घडायला नको होते, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.