डेंगीचा फणफणाट

डेंगीचा फणफणाट

Published on

तारापूर, ता, ९ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात डेंगीने डोके वर काढल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभाग हवालदिल झाला आहे. जानेवारी ते जूनपर्यंत डेंगीचे १५३ रुग्ण आढळले असून, सर्वाधिक रुग्ण पालघर तालुक्यातील आहेत. वाढलेली रुग्णसंख्या पाहता आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

पालघर जिल्ह्यात डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातही डासांचा प्रादुर्भाव जास्त आहे. हिवताप निर्मूलन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते जूनपर्यंत जिल्ह्यात १५३ रुग्ण आढळले आहेत. सुदैवाने एकही मृत्यू झाला नाही. जूनमध्ये ही रुग्णसंख्या १८ असून, पावसाने जोर पकडल्यावर नागरिकांनी नियमाला अनुसरून काळजी घेतली नाही, तर डासांच्या संख्येत वाढ होऊन रुग्णसंखेतही वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, मात्र हिवताप नियंत्रणासाठी कामगारांची पदभरती झाली आहेत. त्यामुळे हे लोक घरोघरी जाऊन तपासणी करतात.

एडिस डासामुळे पसरणारा डेंगी हा विषाणूजन्य आजार आहे. या डासांच्या पायावर पांढरे पट्टे असतात, म्हणून त्याला टायगर मॉस्किटो असे म्हणतात. हा डास दिवसा चावतो आणि त्याची लक्षणे दिसण्यास सुमारे चार ते सहा दिवस लागतात. ताप येण्याच्या एक दिवस आधी व ताप आल्यानंतर पाच दिवस विषाणू मोठ्या प्रमाणात असतात. त्या वेळी रुग्णास डास चावल्यास शरीरात ते विषाणू जातात.

डासांच्या प्रत्येक उत्पत्ती स्थानाच्या ठिकाणी एकावेळी एक मादी डास १०० ते १५० अंडी घालते. एक मादी डासाचे सरासरी आयुर्मान हे तीन आठवड्यांचे असते. या तीन आठवड्यांच्या कालावधीत मादी डास तीन किंवा चार वेळा साचलेल्या पाण्यात अंडी घालते, म्हणजेच एक मादी डासामुळे साधारण ४०० ते ६०० डास तयार होतात. हे डास मलेरिया, डेंगीसारख्या आजाराच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. या रोगाचा प्रसार होऊ नये, याकरिता आणि डासांच्या उत्पत्तीला टाळण्यासाठी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

कोणती काळजी घ्यावी?
एडिस डासाची उत्पत्ती रोखण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवावा. घराभोवती परिसरात ज्यामध्ये पाणी साचू शकेल अशा निरोपयोगी वस्तू साचू देऊ नये, त्या नष्ट कराव्यात. टायर्स दुकानात टायर्समध्ये पाणी साठणार नाही, अशा पद्धतीने रचण्यात यावे. गप्पी माशांचा वापर करावा. पाणीसाठे मोकळ्या जागेत ओतावे. डेंगी आजारावर उपचार नाहीत. फक्त लक्षणानुसार उपचार करतात. त्यामुळे प्रतिबंध हाच चांगला उपाय आहे.

लोकांच्या रक्ताचा नमुना घेऊन तपासणी करण्यात येत आहे. कोरडा दिवस पाळणे, तसेच फवारणी करून परिस्थिती आटोक्यात आणण्यात येते. ज्या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत, त्या ठिकाणी लगेचच उपायोजना करत आहोत.
- डॉ. संतोष चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी


सहा महिन्यांतील डेंगीची आकडेवारी
तालुका रुग्णसंख्या
पालघर ३९
डहाणू २४
तलासरी ०९
मोखाडा १९
जव्हार १९
विक्रमगड १०
वाडा १२
वसई २१
एकूण १५३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com