कोट्यवधींच्या रस्त्याला दुभाजकाचा विसर
मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. ९ : अंबरनाथ-बदलापूर मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे काम दोन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले. कोट्यवधींचा खर्च करून हा रस्ता नव्याने बांधण्यात आला. त्यात संबंधित ठेकेदाराला या कामाचे संपूर्ण पैसे अदा करण्यात आले. मात्र, या मुख्य रस्त्याच्या दुभाजकाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. दुभाजकासाठी तयार केलेले खड्डे आहे त्या अवस्थेत आहे. अनेकदा या ठिकाणी मोठ्या वाहनांचे चाक अडकत असल्याने हा मुख्य रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे.
मुंबई ते बदलापूर असा वाहतुकीसाठी असलेला महामार्ग धोकादायक स्थितीत आहे. दोन वर्षांपूर्वी डांबरीकरणाचे सगळेच रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचे ठरल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम हाती घेतले. राज्य सरकारच्या कोट्यवधींच्या निधीतून हा रस्ता बांधण्यात आला. महामार्गाचे काम पूर्ण झाले; मात्र संबंधित ठेकेदाराने मुख्य महामार्गावर दुभाजक बांधलेच नाहीत. या महामार्गावर ५० ते १०० मीटर असा भाग सोडून, थोड्या थोड्या पट्ट्यात दुभाजक बांधले आहेत. उर्वरित भागात केलेला खड्डा त्याच स्थितीत असल्याने या ठिकाणी अंदाज न आल्याने चारचाकी वाहनांची चाके खड्ड्यात अडकत आहेत. यामुळे काही वाहनांचे किरकोळ नुकसानही झाले आहेत. त्यातच या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. भविष्यात या ठिकाणी एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असताना रस्ता बांधकामासाठी निविदा काढून कोट्यवधींचा खर्च करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दुभाजकाचे काम पूर्ण झाले की नाही, याबाबत कल्पनाच नव्हती. वाहनचालकांनी तक्रारी दिल्यानंतर, तसेच बातमी संदर्भात प्रतिक्रिया विचारताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दुभाजक नसल्याची माहिती मिळाली.
आर्थिक हितसंबंध असल्याची चर्चा!
संपूर्ण रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटच्या कामाची निविदा काढून ठेकेदाराला जर पूर्ण बिल अदा केले आहे, तर काम पूर्ण झाल्याची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली नाही का? केली असेल तर, हे अपूर्ण राहिलेले काम विभागाला लक्षात आले नाही का? आणि जर लक्षात आले असेल तर, ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये काही आर्थिक हितसंबंध आहेत का? ज्यामुळे इतकी मोठी चूक दोन वर्षांपासून दुर्लक्षित आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
रस्त्याचे बांधकाम होऊन पाच ते सहा महिने उलटले आहे. रोजच कामानिमित्त या रस्त्यावरून ये-जा सुरू असते. मात्र, या ठिकाणी दुभाजकाचे काम अद्याप झालेले नाही. अनेकदा वाहतुकीतून मार्ग काढताना दुभाजकासाठी खोदलेल्या खड्ड्यात गाडीचे चाक अडकते. गाडीवर नियंत्रण असल्यामुळे मोठ्या अपघातापासून वाचलो; मात्र गाडीचे यात नुकसान झाले आहे.
- ऋषिकेश नायकोडी, वाहनचालक
रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. ठेकेदाराला संपूर्ण पैसे अदा करण्यात आले आहेत; मात्र दुभाजकाचे काम का पूर्ण करण्यात आले नाही? याबाबत संबंधित ठेकेदाराकडून माहिती घेऊन ताबडतोब उर्वरित काम करण्यास त्याला सूचना देऊ. लवकरच हे काम पूर्ण करून घेण्यात येईल.
- प्रशांत कुमार मानकर, अधिकारी
सार्वजनिक बांधकाम विभाग
बदलापूर : अंबरनाथ-बदलापूर मुख्य रस्त्यावरील दुभाजकाचे अद्याप करण्यात आलेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.