डोंबिवली स्थानक परिसर चकाचक

डोंबिवली स्थानक परिसर चकाचक

Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ : डोंबिवली स्थानक परिसराची सफाई झाली, स्टेशन परिसरातील फेरीवाले हटले. एवढेच नाही तर रस्त्यावरील खड्डे भरण्याची लगबग सुरू झाली. मंगळवारी सकाळपासूनच डोंबिवली शहरात वेगळेच चित्र दिसून येत होते. हे पाहून डोंबिवलीकरांना चुकचुकल्यासारखे होत होते. पालिका आयुक्त अभिनव गोयल यांचा डोंबिवलीत दौरा असल्याने कर्मचाऱ्यांची ही लगबग सुरू केली होती.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन केले होते. दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी पालिकेच्या वतीने नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार मुख्य कार्यालयात भरवण्यात येतो. यंदा प्रथमच डोंबिवली विभागीय कार्यालयात भरवण्यात आला. कल्याण-डोंबिवली शहरातील अनेक रस्त्यांची खड्डे पडून चाळण झाली आहे. फेरीवाल्यांची समस्या तर कायम आहे. याविषयी अनेकदा तक्रारी करूनही पालिका प्रशासन त्याकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही. मंगळवारी मात्र शहरात वेगळेच चित्र दिसून आले. पालिका आयुक्त गोयल हे डोंबिवलीत येणार असल्याने पाऊस सुरू असतानाही खडी टाकून खड्डे बुजविले जात होते. तसेच स्थानक परिसरात एकही फेरीवाला दिसून आला नाही.

उघडीपनंतर रस्ते दुरुस्ती
याविषयी पालिका आयुक्त गोयल यांना विचारले असता त्यांनी सांगितले, खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम आपण सातत्याने करत असतो. ज्या रस्त्यावर खड्डे पडून अपघात होऊ शकतात तिथे प्राधान्याने काम केले जाते. पावसाने उघडीप दिल्यानंतर रस्ते दुरुतीची कामे हाती घेतली जातील तसे नियोजन आहे.

लवकरच कायमस्वरूपी तोडगा!
फेरीवाले हटले तर त्यांची जागा रिक्षाचालकांनी घेतली याविषयी आयुक्त म्हणाले, पालिका प्रशासन, पोलिस प्रशासन, आरटीओ यांची एक बैठक नुकतीच पार पडली आहे. त्यानुसार शहराची रचना, फेरीवाले, वाहतूक नियोजन, वाहन पार्किंग अशा अनेक बाबींवर चर्चा झाली आहे. यावर लवकरच तोडगा निघून ठोस उपाययोजना केली जाईल. जेणेकरून रस्ते मोकळे होऊन नागरिकांना सुटसुटीत रस्ते मिळतील. एक चांगले शहर आपण निर्माण करू शकू. रिक्षा थांब्याचा प्रश्न आहे; मात्र हे सगळे विषय एका बैठकीत सुटणारे नाहीत. यावर लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल असे ते म्हणाले.


आयुक्तांची उशीरा हजेरी
डोंबिवलीत प्रथमच जनता दरबार भरवण्यात आल्याने नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी दुपारी १ वाजल्यापासूनच फ प्रभाग कार्यालयात गर्दी केली होती. सायंकाळचे ४ वाजत आले, तरी अनेक नागरिकांना टोकन मिळाला नसल्याने नागरिक वैतागले होते. आयुक्त जनता दरबारात एक तास उशिराने पोहोचले. कल्याण मुख्यालयातील काही बैठका व वाहतूक कोंडी यामुळे आयुक्तांना येण्यास उशीर झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com