हरित ठाण्याचा संकल्प

हरित ठाण्याचा संकल्प

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : शहरासह विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील हरित पट्टा हरवत असल्याची टीका पर्यावरणप्रेमींकडून पालिकेवर होत आहे. त्यामुळे शहरातील पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी महामार्गांच्या कडेला तसेच दुभाजकांमध्ये बांबूची लागवड करण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण विभागाने घेतला आहे.
ठाणे पालिका क्षेत्रात विविध विकासकामांमध्ये बाधित झाडांची बेसुमार तोड करण्यात आली आहे. यामुळे शहरातील पर्यावरणाचे बिघडत असलेले संतुलन राखण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने विविध उपाययोजनांवर भर दिला आहे. त्यानुसार जागतिक पर्यावरणदिनानिमित्ताने ठाणे पालिकेने ‘उपमुख्यमंत्री हरित ठाणे’ अभियानअंतर्गत वर्षभरात दोन लाख वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. याच अनुषंगाने ठाणे तसेच घोडबंदर भागातील महामार्गाच्या रस्त्यालगत तसेच दुभाजकांमध्ये बांबूची लागवड करण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण विभागाने घेतला आहे. ठाणे आणि मुंबई शहराच्या वेशीवर बांबूची झाडे लावण्यात येणार आहेत. यामध्ये आनंदनगर ते कोपरी पूल, माजीवाडा रस्ता तसेच गायमुख परिसराचा समावेश आहे.
काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला तीस फुटी, तर दुभाजकांमध्ये सात ते आठ फुटी बांबूच्या हिरव्या भिंती उभारल्या जाणार आहेत.
-------------------------------------------------------
ऑक्सिजननिर्मितीवर भर
ठाणे शहरात विकासकामात बाधित होणाऱ्या शेकडो झाडांवर तोडक कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरातील हरित पट्टा कमी झाल्याने प्रदूषणात होणारी वाढ रोखणे, हा पालिकेसमोर पेच होता. त्यावर उपाय म्हणून जास्त ऑक्सिजन देणारी बांबूची लागवड महामार्गाच्या कडेला तसेच दुभाजकात करण्यात येणार आहे. पुण्यातील नर्सरीतून ही रोपे मागवण्यात आली असल्याची माहिती पालिका उपायुक्त मधुकर बोडके यांनी दिली.
---------------------------
प्रदूषणातून मुक्तीचा मार्ग
- ठाणे शहरासह पालिकेच्या माध्यमातून भिवंडी आतकोली येथे उभारलेल्या कचरा प्रकल्पाचे प्रदूषणाचे प्रमाण रोखण्यासाठी बांबूच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात बांबू प्रजातींच्या एक हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे.
- शहरातील ऑक्सिजनचे घटते प्रमाण, प्रदूषणाची होणारी घट भरून काढावी, या उद्देशाने शहरातील महामार्गाच्या रस्त्यालगत व दुभाजकांमध्ये बांबूची लागवड करण्यात येत आहे. यामुळे वाहनांच्या आवाजामुळे परिसरात ध्वनी प्रदूषण होते, तेही बांबूच्या भिंतीमुळे कमी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com